उत्तराधिकारी

जेव्हा जेव्हा महासत्ता अथवा महान व्यक्ती लोप पावल्या आहे. त्यानंतर त्यांच्या जागेवर हक्क मिळवण्यासाठी जे भयानक राजकारण होते ते आपण समाजात राहून पाहतो आणि अनुभवतो आहे. जर उत्तराधिकारी पूर्वनियोजित असेल तर तितका वाद होत नाही, पण तो निर्णय सर्वांना पटलेला आणि पचलेला असेलच असं नाही.
खरंच उत्तराधिकारी म्हणजे काय मग??? सत्ताकारण, राजकारण, संपत्तीकारण बस्स इतकंच!!! खरचं या नश्‍वर गोष्टी इतक्या महत्त्वाच्या आहेत. जर सत्ता, संपत्ती नसेल तर ती व्यक्ती गौण ठरते का??? आजच्या काळात सगळ्यांनाच सगळीकडे स्वतःची सत्ता गाजवयची आहे, वर्चस्व हवं आहे. आपल्याच अमर्याद अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी लोक अक्षरश: खालच्या पातळीला आले आहेत. उत्तराधिकारी हा ठरलेला असो किंवा नसो सत्ता अन् संपत्तीवाद ठरलेला असतोच कारण सगळ्यांनाच थोडं सगळंच पटतं!!!
अहो आपण जगाचं काय धरून बसलोय. शरीर क्षीण झाले तरी घरातील वर्चस्व, स्त्रीसत्ता काही सुटत नाही. खूप म्हणजे अगदी नगण्यच अश्या स्त्रिया असतात, ज्यांना घरची नवीन लक्ष्मी आल्यावर तिला घरातील सर्व अधिकार देण्याचा समजूतदारपणा आणि मनाचा मोठेपणा हा निसर्गदत्त असतो. घरातील जबाबदारी घरच्या नवीन लक्ष्मीवर सोपवून स्वतःहून निवृत्त होणं सर्वच स्त्रियांना नाही जमत!!! खरं तर चार भिंतींच्या पलीकडचे हे जग घरात स्वतःचीच सत्ता गाजवणार्‍या स्त्रियांना कधी दिसतच नाही. त्यापलीकडेही जग आहे हे त्यांना ठाऊकच नाही.
उत्तराधिकारी फक्त सत्ता, संपत्ती, घर, वैभव यातच आहे का? जी लोक या शब्दांमध्ये उत्तराधिकारी शोधत असतील आणि त्यांना सगळं मिळून ही ती कितपत समाधानी असतात??? हा विषयच चर्चेचा आहेच आणि कायम राहणार!!!
आई-वडील नेहमीच आपल्या मुलांच्या भविष्यासाठी चिंतेत असतात त्याप्रमाणे त्यांना शिक्षण, शिस्त, वळण लावण्याचा प्रयत्न ही करतात. पण त्यांचं चरित्र जर उत्तम बनवायला फक्त चांगले संस्कार, मूल्य आणि तत्त्व यांचा अंगीकार हवा. या सद्गुणांची जाणीव होणं फार गरजेचे आहे. ज्यांच्या ठायी हे सद्गुण आहे ते जगात नावलौकिक मिळवतात. कारण जिथून त्यागाची भावना जन्म घेते तिथे रामायण होत असतं आणि जिथून स्वार्थ सुरू होतो तिथे महाभारत होत असतं. शेवटी दोन्ही गोष्टी संस्कार, मूल्य, तत्त्व यांच्या आहेत. आपण जर उत्तम चरित्र घडवलं तर सर्वत्र सुकीर्तिमान होतो. याचं उदाहरण द्यायचे झाले तर मंथरा ही रामाच्या सान्निध्यात राहूनही सुधारली नाही आणि विभिषण हा रावणाच्या राज्यात राहूनही त्याने आपली नीतिमत्ता बदली नाही. हा प्रश्न संस्कार अन् विचारांचा आहे. थोडक्यात सर्व विचार, संस्कार, शिकवणं, मूल्य, तत्त्व यावर अवलंबून आहे.
संपत्ती, सत्ता, वर्चस्व इतर कोणत्याही गोष्टींचे उत्तराधिकारी एकाहून अधिक असू शकतात; पण संस्कार, शिकवणं, मूल्य, तत्त्व यांचे उत्तराधिकारी मात्र फार कमीच आहे. आपण श्रेष्ठत्वावरून उत्तराधिकारी ठरवतो. खरं सांगू का आपण आजही श्रेष्ठ आणि उत्तम म्हणजे काय यातच अडकलेले आहोत. आपण श्रेष्ठ होण्यापेक्षा जर उत्तम होण्यासाठी प्रयत्न केला तर आपण भगवंताच्या नजरेत सर्वोत्तम असू. हे मात्र नक्की खरं!!! हा प्रश्‍न सर्वतोपरी आपण कसा विचार करतो यावर विसंबून आहे.
आई-वडिलांच्या संपत्तीचे वारस म्हणजे उत्तराधिकारी एकापेक्षा अधिक असतात आणि पूर्वापार आणि भविष्यात ही अधिक असतील. पण आयुष्यभर साधं, सरळ मार्गावर, शुद्ध नीतिमत्ता, मूल्य, तत्त्व यावर आयुष्य वेचून चालणार्‍या आई-वडिलांच्या या अनमोल संपत्तीचे जर आपण वारस म्हणजे उत्तराधिकारी झालो तर त्यांची सुकीर्ती विश्‍वातील नाही तर तिन्ही लोकीही होते. नश्‍वर गोष्टींचे उत्तराधिकारी होण्यापेक्षा उत्तम संस्कार, शिकवणं, मूल्य, तत्त्व यांचे उत्तराधिकारी झालो तर आपले पूर्वजही समाधान पावतील. आणि अशाच व्यक्ती भगवंतालाही प्रिय आहेत.
श्रद्धा बोरसे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *