वटपौर्णिमा

परंपरेतून पर्यावरणापर्यंत नेणारा सांस्कृतिक वारसा

प्रार्थनेची शक्ती आपल्या मनातील आकांक्षा दात्यापर्यंत पोहोचवते. भारतीय संस्कृतीत सणावारांना विशेष महत्त्व आहे. कारण त्यातून प्रत्येक नातेसंबंधाला बांधून ठेवण्याची ताकद निर्माण होते. प्रत्येक सणामागे काहीतरी उद्देश असतो, जो कळत नकळत साध्य होतो.
व्रतवैकल्ये स्त्रीजीवनाशी निगडित असून, ती अगदी बालवयापासून ते विवाहापर्यंत प्रत्येक नात्यामध्ये उतराई होताना दिसतात. विवाहानंतर मात्र, तिच्या हळव्या आणि लाघवी मनाची एकच आकांक्षा असते ती म्हणजे, तिचे सौभाग्य. जन्मोजन्मी सौभाग्याचे दान मिळावे, जन्मोजन्मी तुझ्या ऋणानुबंधात मी राहावे. शिव-पार्वतीपासून ते आजही पती-पत्नीच्या नात्यात एक अतूट, पवित्र बंधन आहे. विवाह हे फक्त बंधन नाही, तो एक बंध आहे.
काही हजारो वर्षांपूर्वी सावित्रीने आपल्या पतीचे, म्हणजेच सत्यवानाचे प्राण वटवृक्षाच्या छायेत वाचवले, असे आपण ऐकत आलो आहोत. याचा ऊहापोह न करता, यातून आपल्या प्रिय व्यक्तीवरील आस्था आणि प्रार्थनेची ताकद समजते. ती एक हृदयस्पर्शी शक्ती आहे. तुम्हारी प्रार्थना फूल की गंध की तरह होनी चाहिए.- ओशो.
आज आपल्यावर सत्यवान आणि सावित्रीसारखी वेळ येणार नाही. कारण तितके अरण्य आणि एकांत हे फक्त नावापुरते उरले आहे. त्याची जागा आता झगमगाट जीवनशैली आणि दिखाव्याने घेतली आहे. असो. याच आख्यायिकेचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास केला तर, आजच्या सावित्रीच्या लेकी म्हणून आपलेही उत्तरदायित्व महत्त्वाचे आहे. ते या अर्थाने की, सर्वाधिक ऑक्सिजनचा पुरवठा करणार्‍या विविध झाडांचे वृक्षारोपण आणि त्यांचे संरक्षण म्हणजे आजच्या आपल्या प्रत्येकाच्या श्वासाचे रक्षण म्हणता येईल.

सुनीता सानप-सांगळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *