द्राक्षपीक हाती येण्याची शक्यता धूसर, शेतकरी चिंताग्रस्त
पिंपळगाव बसवंत ः प्रतिनिधी
निफाड तालुक्यासह पिंपळगाव बसवंत व परिसरात ऐन मे महिन्यात कोसळलेल्या धुवाधार पावसामुळे परिसरातील द्राक्षबागा धोक्यात आल्या आहेत. द्राक्षाची मालकाडी परिपक्व होण्याच्या दिवसांतच मुसळधार झाल्यानेे बहुसंख्य द्राक्षबागेची काडीच तयार झालेली नाही. त्यामुळे पुढील हंगामात द्राक्षपीक हाती येण्याची शक्यता धूसर झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. शेतकर्यांसमोर उभे ठाकलेले संकट लक्षात घेऊन शासन व द्राक्ष बागायतदार संघाने शेतकरी हिताचे धोरणात्मक निर्णय घ्यावेत, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, द्राक्षबागेची एप्रिल छाटणी झाल्यानंतर एप्रिल व मे महिन्यात तापमानामुळे द्राक्षाची काडी परिपक्व होत असते. मालकाडी पक्व झाल्यानंतर द्राक्षाचे भरघोस पीक हाती येते. मात्र, यंदा मे महिन्यात अवकाळी पावसाने हाहाकार करून शेतकर्यांसमोर मोठे संकट उभे केले आहे. मे महिन्यात अनपेक्षितपणे झालेल्या पावसामुळे द्राक्षशेतीच धोक्यात आली आहे. द्राक्षमुळी अडचणीत आली आहे, तर ओलांड्यांना मुळी फुटणे, करपा, डाउनी आदी रोगांचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. यामुळे द्राक्षघड निर्मितीत अडचणी येऊ शकतात. म्हणूनच द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
उत्पादन खर्चात वाढ,
कर्जफेड, प्रपंच चालवणे, अशी आव्हाने सध्या शेतकर्यांसमोर उभी ठाकली आहेत. मुळात गत अनेक वर्षांपासून द्राक्षशेती संकटात व तोट्यात असून, याचा परिणाम म्हणजे शेतकर्यांची प्रचंड आर्थिक कोंडी झाली आहे. पीककर्ज, मध्यम मुदत कर्ज, द्राक्ष पीकपूरक शेती अवजारे, कर्ज
फेडायचे कसे, या चिंतेत शेतकरी आहेत. या नैराश्यातून शेतकरी आत्महत्या होऊ नये म्हणून शासनाने कर्जमाफी, पीकविमा याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन शेती व शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
पिंपळगाव बसवंत व परिसरात एकाच दिवशी अडीच तासात 135 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय संपूर्ण मे महिन्यात धो-धो पाऊस पडला आहे. याचा थेट परिणाम द्राक्ष उत्पादनावर होणार आहे. पुढील हंगामात निर्यातक्षम सोडाच, पण स्थानिक बाजारपेठेतही द्राक्षे दिसणार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणून शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन शेतकर्यांना कर्जमाफी, तसेच नुकसानभरपाई म्हणून पीकविमा द्यावा.
– सोमनाथ लहानू मोरे, द्राक्ष उत्पादक, पिंपळगाव बसवंतगेल्या तीन आठवड्यांत उंबरखेड व परिसरात अनेक वेळा ढग
फुटीसदृश पाऊस झाला. यामुळे द्राक्षबागेला टाकलेले महागडे शेणखत पाण्याबरोबर वाहून गेले. द्राक्षाची मालकाडी तयार झालेली नाही. सतत होणार्या पावसामुळे फवारणी ठप्प आहे. त्याचा आर्थिक फटका शेतकर्यांना बसणार असून, शासनाने संपूर्ण कर्जमाफी देऊन शेतकर्यांना दिलासा द्यावा.
– गणपतराव पानसरे,
द्राक्ष उत्पादक,
उंबरखेड (ता. निफाड)