जिल्ह्यात 621 ग्रामपंचायतींचा समावेश
नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 तसेच सन 2022 च्या महाराष्ट्र अधिनियम क्र. 22 अन्वये ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागरचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या
निर्देशानुसार ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. संबंधित प्रशासकीय यंत्रणांना निश्चित मुदतीत कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जानेवारी ते डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपणार्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींसाठी प्रभागरचना करण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपण्याच्या सहा महिन्यांपूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम आखण्यात आला आहे.
तहसीलदारांकडून गावनिहाय नकाशे सुपर इम्पोज करून 20
फेब्रुवारी 2026 पर्यंत अंतिम नकाशे तयार केले जातील. त्यानंतर तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त पाहणीतून 27 फेब्रुवारीपर्यंत प्रभाग सीमा निश्चित करण्यात येतील. 5 मार्च रोजी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून प्रारूप प्रभागरचनेची तपासणी होईल. 11 मार्च रोजी प्रारूप रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे सादर केला जाईल. 17 मार्च रोजी प्रस्तावाची तपासणी करून तो राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येईल. 23 मार्च रोजी आयोगाकडून आवश्यक दुरुस्त्या करून मान्यता देण्यात येणार आहे. 30 मार्च रोजी दुरुस्त्या समाविष्ट करून तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून प्रारूप प्रभाग रचनेस अंतिम मान्यता देण्यात येईल व सर्व सदस्यांच्या स्वाक्षर्या घेतल्या जातील. 7 एप्रिल रोजी नमुना ‘ब’ मध्ये प्रारूप प्रभाग रचनेला व्यापक प्रसिद्धी देण्यात येईल.
13 एप्रिल हा हरकती व सूचना सादर करण्याचा अंतिम दिनांक असेल. 21 एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी सर्व हरकतींवर सुनावणी घेतील. 23 एप्रिल रोजी सुनावणीनंतरचा अभिप्राय नोंदवून प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे सादर केला जाईल. 28 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी अंतिम प्रभाग रचना निश्चित करून राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवतील. 4 मे रोजी आयोगाच्या मान्यतेनंतर अंतिम प्रभाग रचनेला प्रसिद्धी देण्यात येईल. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात एकूण 621 ग्रामपंचायती या प्रक्रियेत समाविष्ट आहेत. यात सिन्नर (100), मालेगाव (99), येवला (69), निफाड (65), दिंडोरी (60), नांदगाव (59), चांदवड (53), बागलाण (40), कळवण (29), नाशिक (24), देवळा (11), इगतपुरी (9) आणि त्र्यंबकेश्वर (3) ग्रामपंचायतींचा समावेश आहे. प्रक्रिया पारदर्शक, नियमबद्ध व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे.
Ward formation program announced for Gram Panchayat elections