नाशिक शहराची वाहतूक व्यवस्था आता नव्या टप्प्यात प्रवेश करीत आहे. कुंभमेळ्याचे पडघम वाजू लागले आहेत. सर्वत्र रस्ते फोडून नवीन रस्ते आकार घेत असताना वाहतुकीच्या समस्येने अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. सीसीटीव्ही आणि ई-चलन प्रणालीमुळे शिस्तीची सुरुवात झाली असली, तरी तिचे यश रस्तेदुरुस्ती, पार्किंगची समस्या, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सुधारणा आणि शहरातील अतिक्रमण हटविणे, या गोष्टींशी जोडलेले आहे. प्रशासन, तंत्रज्ञान आणि नागरिक यांचा समन्वय साधला गेला तरच वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल, अन्यथा केवळ कॅमेर्यांच्या नजरेतून दंड आकारून समस्यांचे पूर्ण निराकरण होणार नाही.
नाशिक शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. परगावातील, राज्यातील अनेक नागरिक नाशिक शहर आणि उपनगरांमध्ये उदरनिर्वाहासाठी, सेकंड होमसाठी प्राधान्य देत आहेत. परिणामी शहराच्या गर्दीत भर पडत असून, वाहतुकीवर ताण पडत आहे.शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी दरवेळी नियम आणि दंडाचे प्रयोग केले जातात, परंतु नव्याचे नऊ दिवस प्रयोग नंतर व्यर्थ ठरतात. असेच काहीसे चित्र मागील काही वषार्ंत दिसले आहे. त्यामुळे नुकतीच वाहतूक पोलीस विभागाकडून ई-चलनची कारवाई करण्यास सुरवात झाली आहे. या कारवाईमुळे वाहनचालकांना शिस्त लागेल की नव्याचे नऊ दिवस ठरेल, हे आगामी काळच ठरवेल.
हेल्मेटसक्ती असो, सिग्नल यंत्रणा असो, एका प्रयोगात वाहतूक नियम तोडल्यावर वाहतूक व्यवस्थेवर निबंध लिहिण्यास सांगण्यात आले होते. परिणाम काय झाला शून्य.वाहतुकीचे नियम काटेकोरपणे राबविण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते. परंतु अनेकदा नियम मोडल्यावर दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी पोलिसांना चिरीमिरी देऊन सुटका किंवा दंडाची रक्कम भरून कधीकधी वाद घालून सुटका करण्यावरच वाहनचालकांचा जोर दिसून येतो.
सध्या नाशिक शहरात दि. 20
फेब्रुवारीपासून उच्च प्रतीच्या सीसीटीव्हींद्वारे सिग्नलवर नजर ठेवली जात आहे. सिग्नल तोडणारे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर ई-चलनची कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अशी कारवाई वाहनचालकांना शिस्त लागावी, अपघात होऊ नये, तसेच गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहे.पण वाहनधारकांची मानसिकता नियम तोडण्यात अधिक असल्याने, तसेच दंड भरून सुटका करून घेण्यात अधिक असल्याचेच आतापर्यंत दिसले आहे.
शहरातील वाढती वाहतूक, बेशिस्त वाहनचालक आणि अपघातांचे प्रमाण या पार्श्वभूमीवर शहरात वाहतूक शिस्त लावण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे. नाशिक पोलीस आयुक्तालय आणि नाशिक स्मार्ट सिटी यांच्या समन्वयातून शहरातील 40 सिग्नलवर हाय-रिझोल्यूशन सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले असून, त्यांच्या आधारे ई-चलन प्रणालीची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
सिग्नल तोडणे, झेब्रा कॉसिंग ओलांडणे, ट्रीपलसीट, अनधिकृत यूटर्न, हेल्मेट किंवा सीटबेल्ट न वापरणे, वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे अशा नियमभंगावर थेट कॅमेर्याच्या नजरेतून दंड आकारला जाणार आहे. या नव्या व्यवस्थेमुळे पोलीस दिसत नाहीत म्हणून नियम मोडता येतात, ही मानसिकता बदलण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यामुळे दंडाचा संदेश मोबाइलवर येताच अनेक वाहनचालकांना नव्या डिजिटल शिस्तीची जाणीव झाली आहे.
या उपक्रमामागील मुख्य उद्देश दंड आकारणे नसून, अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि वाहतूक शिस्त निर्माण करणे, हा आहे. सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंगवर वाहन नेणे किंवा वेगमर्यादा ओलांडणे यामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी सततची नजर आवश्यक आहे. 24 तास कार्यरत असलेली ही प्रणाली त्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.
पार्किंगची समस्या हा आणखी एक ज्वलंत प्रश्न आहे. बाजारपेठा, व्यापारी संकुले, शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयांच्या परिसरात नियोजित पार्किंगची कमतरता आहे. परिणामी रस्त्यांच्या कडेला अनधिकृत पार्किंग वाढते आणि वाहतूक कोंडी निर्माण होते. नियोजित पार्किंग सुविधा उभारल्यास वाहतूक शिस्तीला मोठी मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
We will not improve..!