*पंचाहत्तर वर्षांत काय झाले… ?
डॉ. संजय धुर्जड*
नाशिक.
गेल्या एक वर्षापासून भारतात एक प्रश्न सातत्याने विचारला जातोय… भारताने गेल्या ७५ वर्षांत काय केले? याचे उत्तर प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकेल, आणि आहे ही. ज्याने इतिहास आणि वर्तमान जसा बघितला तसे त्याचे उत्तर असणार आहे. ज्यांनी मागील ७५ वर्षांतील अधिकांश काळ बघितलेला आहे, त्याला याचे नक्की उत्तर माहीत आहे, कारण ती व्यक्ती या बदलणाऱ्या काळाचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे. ज्या व्यक्ती २१व्या शतकात जन्मल्या आहेत, त्यांना २०व्या शतकातील पाच दशकांचा इतिहास कदाचित माहीत नसेल… आणि जरी त्याच्या पालकांनी अथवा घरातील थोरल्यांनी माहिती करून देण्याचा प्रयत्न केला असेल, तरी या तरुणांनी त्याकडे जुनाट गप्पा, गरिबीच्या चर्चा, गाऱ्हाणे, कटकट, बोअरिंग टॉपिक, अनावश्यक उपदेश, फालतू गोष्टी असे लेबल लावून त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. खचितच, कुणी असेल ज्यांनी या गोष्टींकडे गांभीर्याने बघितले असेल, विशेष करून शहरी भागातील युवकांनी तरी नक्कीच याकडे दुर्लक्ष केले आहे, असा माझा अंदाज आहे.
शहरातील गतिमान जीवनशैलीमुळे युवकांना या जुन्या गोष्टींकडे बघायला आणि लक्ष द्यायला तितकासा वेळही नाही. ही मुलं इतकी व्यस्त असतात की त्यांना आपल्या पालकांच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यातच त्यांचा पूर्ण वेळ खर्ची पडतो आहे. जरी वेळ असलाच तर तो मित्र मैत्रिणी, मोबाईल, टीव्ही, मुव्ही, इंटरनेट, आणि सोशल मीडियात, किव्हा नशा करत त्यात रमण्यात खर्ची पडतो. मॉडर्न आणि फास्ट लाईफच्या नावाखाली स्वतःला नाही त्या ठिकाणी आणि नको त्या माध्यमांच्या प्रभावाखाली येऊन आपले मत तयार करतात. असाच एक प्रश्न या तरुणांच्या मनात बिंबवला जातो आहे. भारताने गेल्या ७५ वर्षांत काय केले? हा प्रश्न विचारणारे आणि त्याचे उत्तर देणारे काही ठराविक राजकीय मंडळी आपल्या तरुण पिढीला आपल्या स्वार्थासाठी भ्रमित करत आहे. हीच तरुण मंडळी निवडणुकीत निर्णायक मतदान करून एका विशिष्ठ विचारसरणीच्या मंडळींना सत्तेत बसवत आहे. एकूण मतदारांपैकी याच पाच टक्के मतदात्यांच्या मतांमुळे निकालात फरक पडतो आहे… असो, आजचा आपला हा विषय नाही.
खरोखर तुम्ही एका तटस्थ भूमिकेतून विचार करा, आणि स्वतःला हा प्रश्न करून त्याचे मनापासून उत्तर द्या, की गेल्या ७५ वर्षांत खरंच भारताने प्रगती केली आहे की नाही? माझ्यासारख्या मध्यमवयीन व्यक्तीला विचारल्यास मी म्हणेन की हो, भारताने खरोखर प्रगती केली आहे. कुणा एका व्यक्तीमुळे नाही, किव्हा कुठल्या राजकीय पक्षाने नाही, किव्हा कुठल्या अमुक एका कारणामुळे नाही, तर एकंदरीत भारताने एक देश, एक संस्कृती, एक सांघिक परिवार, एक लोकशाहीवादी आणि शांतीप्रिय राष्ट्र म्हणून निश्चितच प्रगती केली आहे. कृषी, शिक्षण, अर्थ, उद्योग, सुरक्षा, तंत्र आणि तंत्रज्ञान, अवकाश संशोधन व यान तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सुविधा, दळणवळण, निर्यातक्षमता, क्रीडा या सर्व क्षेत्रात भारताने आपली छाप पाडली आहे. आज जगभरातील अग्रगण्य बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सी.ई.ओ. हे जन्माने भारतीय किव्हा भारतीय वंशाचे आहेत. याला प्रगती नाही म्हणायचे तर काय म्हणायचे ?
कधी काळी असे म्हंटले जायचे की ब्रिटिश साम्राज्यावरील सूर्याचा अस्त कधीच होणार नाही. अशा साम्राज्याला एक लाठी वा गोळी न चालवता, याच ब्रिटिश साम्राज्याला गुढघे टेकवायला भाग पडलेल्या बापूजींचा, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाचा वाटा आहे. त्यांना अनेक नेत्यांचे आणि सर्वसामान्य जनतेचे समर्थन होतेच, यात काही दुमत नाहीच, परंतु स्वातंत्र्य सेनान्यांमध्येही अकारण वाद विवाद निर्माण करून तरुण पिढीला भ्रमित केले जात आहे. कोण श्रेष्ठ, कोण कनिष्ठ सिद्ध करण्यात वेळ, श्रम आणि पैसा खर्च केला जात आहे. जिथे देव आणि संत महात्म्यांना सोडलं नाही, तिथे या स्वातंत्र्य सैनिकांबद्दल असे घडणे काही नवल नाही. सत्तेत असलेल्यांना अशा विषयांतून समाजातील वातावरण तापवून आपली स्वार्थाची पोळी भाजून घेण्यात जास्त रस आहे. महत्वाच्या आणि गंभीर समस्यांकडे दुर्लक्ष करून अनावश्यक विषयांत लोकांना व्यस्थ ठेवायचे, शासकीय यंत्रणा आणि प्रसार माध्यमे यांना हाताशी, वेळप्रसंगी गळ्याशी धरून कारभार केला जात आहे. खरोखर विचार करण्यासारखी बाब आहे… नक्कीच विचार करा!
ऐन दिवाळीत एका महत्वाच्या घडामोडीत असे कळले की भारतीय वंशाचे श्री. ऋषी सूनक हे इंग्लंडचे नवे पंतप्रधान झाले आहे. कारणे आणि परिस्थिती काहीही असो, परंतु ७५ वर्षांपूर्वीपर्यंत त्याच्या दुपटीच्या म्हणजे सुमारे १५० वर्षे राज्य केलेल्या साम्राज्याचे प्रमुख होणे काही सामान्य गोष्ट नाही. विशेष म्हणजे जेव्हा तो देश आर्थिक संकटात असतांना एका भारतीयाने स्वतःहून पुढे येऊन मी या देशाला संकटुन बाहेर काढण्यासाठी मी माझे सर्वकाही देईन, असे म्हणणेही असामान्य बाबच आहे. मुळात भारतीय विचार आणि संस्कृती, त्यातही हळवे, दयाळू, मायाळू आणि मनमिळावू हिंदू संस्कार असल्याने कठीण प्रसंगी मदतीला धावून जाणे ही भारतीयांची खरी ओळख आहे. याच विचारधारेला अनुसरून कधी एके दिवशी भारतीय वंशाचा व्यक्ती अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जर कधी झाला तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही पण अभिमान आणि गर्व तर निश्चितच वाटेल. आता तुम्हीच विचार करा, की भारतीयांच्या या प्रगतीत कुठल्या राजकीय पक्षांचा किव्हा राजकीय व्यक्तीचा तिळमात्र तरी वाटा आणि सहभाग आहे का? ही प्रगती भारतीयांनीच नाही का केली आहे? मग हा श्रेयवाद कशासाठी? विरोधकांना लक्ष करून भूतकाळात झालेल्या चांगल्या बाबी झाकता येणार नाही. गेल्या ७५ वर्षांतील प्रत्येक चांगली आणि वाईट घटना, प्रसंग, परिस्तिथी आणि व्यक्तींमुळे हा बदल आणि ही प्रगती झालेली आहे, हे विसरता कामा नये. याच ७५ वर्षांतील भारत मंथनातून हे अमृतरुपी लोक निर्माण झाले आहे, जी लोक आज जगभरात ठिकठिकाणी जाऊन आपल्या भारताचे नाव उज्वल करत आहे. हाच अमृतविचार आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे, आणि भारतीय संस्कृतीचा मंत्र जगाला द्यायचा आहे. ही एक शिकवण जरी आपण आपल्या पुढच्या पिढीला दिली तरी आपला देश जगावर राज्य करण्याची क्षमता ठेवतो.
*डॉ. संजय धुर्जड*
नाशिक.
9822457732