निफाड तालुक्यातील हजारो युवक-युवती प्रतीक्षेत…
निफाड ः विशेष प्रतिनिधी
राज्य सरकारमधील मुख्यमंत्री अन् मंत्री वारंवार पोलिस भरतीची आश्वासने देत आहेत. त्यामुळे अनेक युवक-युवती गेल्या अनेक महिन्यांपासून भरतीची तयारी करत आहेत. मात्र, राज्य शासनाकडून केवळ आश्वासने मिळत आहेत. प्रत्यक्ष भरतीप्रक्रियेला अद्यापही सुरुवात झालेली नाही. त्यामुळे रोज पहाटे उठून, घाम गाळून तयारी करणारे युवक भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. आश्वासने वारंवार मिळताहेत. मात्र, प्रत्यक्ष पोलिस भरती कधी? असा सवाल निफाड तालुक्यातील युवकांमधून उपस्थित केला जात आहे.
राज्यातील पोलिस दलात डिसेंबर 2024 मध्ये समोर आलेल्या आकडेवारीनुसार 33 हजार पदे रिक्त आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 22 जुलै 2024 ला लवकरच नऊ हजार पदांची पोलिस भरती राबविण्यात येईल, असे आश्वासन दिले होते, तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या धुळे येथील सभेदरम्यान सत्तेत आल्यास 25 हजार महिला पोलिसांची भरती करणार असल्याची घोषणा केली. हीच घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 10 कलमी घोषणेत नोव्हेंबर 2024 रोजी केली. या आश्वासनांवर विश्वास ठेवून पोलिस भरतीच्या उमेदवारांनी तयारीला सुरुवात केली. मात्र, अद्याप भरतीची प्रक्रिया सुरू नसल्याचे नाराजी असल्याचे भरतीची तयारी करणार्या युवकांनी सांगितले. पोलिस खात्यातील रिक्त पदे भरण्यास मान्यता आहे.
भरतीप्रक्रियेबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याने तयारी करणार्या युवकांत संभ्रम आहे. सन 2022- 23 मधील भरतीप्रक्रिया 2023-24 मध्ये राबविण्यात आली होती. बेरोजगारीचे भीषण वास्तव समोर असताना राज्य सरकारमधील मंत्री फक्त आश्वासने देत आहेत. त्यामुळे तरुणांच्या भविष्याचा विचार करून सरकारने पोलिस भरतीची प्रक्रिया लवकर सुरू करावी. भरतीसाठी पूर्ण वेळ देऊन अनेक युवक-युवती तयारी करत आहेत. कोणतेही काम नसल्याने आणि भरतीची प्रक्रिया सुरू नसल्याने युवकांत नैराश्य येत आहे. त्यामुळे त्यांची पावले चुकीच्या दिशेने पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
– राजेंद्र बोरगुडे, संचालक, लासलगाव बाजार समिती
अकॅडमीमध्ये गेली दीड ते दोन वर्षांपासून युवक-युवती पोलिस भरतीच्या तयारीसाठी आले आहेत. राज्य सरकारने आश्वासन देऊनही पोलिस भरतीची जाहिरात निघालेली नाही. त्यामुळे युवकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे, तरी राज्य सरकारने लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करून प्रत्यक्ष पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू करावी.
– नानासाहेब गाजरे, संचालक, कमांडो करिअर अकॅडमी, नैताळे, ता. निफाड