बिहारवर कोणाचे राज्य?

जपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (महाराष्ट्रात महायुती) 2024 ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (शिवसेना) यांच्या नेतृत्वाखाली लढवून जागा जिंकल्या; परंतु भाजपाने शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदी बसविले नाही. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यात आल्यानंतर महाराष्ट्राचा फॉर्म्युला वापरून बिहारमध्येही भाजपा आपला मुख्यमंत्री बनवेल, असे राजकीय वर्तुळात बोलले जात होते. बिहारमध्ये नोव्हेंबर 2025 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने दणदणीत बहुमत मिळविले. भाजपाला 243 पैकी सर्वाधिक 89, तर जनता दल युनियटेडला दुसर्‍या क्रमांकाच्या 85 जागा मिळाल्या. जनता दल युनायटेडचे नेते व तत्कालीन मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढविण्यात आल्या होत्या. भाजपाने कोणतेही आढेवेढे न घेता नितीश कुमार यांना परत एकदा मुख्यमंत्री केले. भाजपाचा मुख्यमंत्रिपदावर डोळा कायम होता. पण नितीश कुमार यांना कसे समजावायचे, हा प्रश्न होता. नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार राजकारणात येण्यास उत्सुक नव्हते. शेवटी त्यांना राजी करण्यात आले. त्यांनी जनता दल युनायटेडचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले. त्यांनी नितीश कुमार यांचा वारसा पुढे चालविण्याचा संकल्प केल्यानंतर नितीश कुमार यांना राज्यसभेत पाठविण्याची खेळी भाजपाने यशस्वी केली. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य होण्याची आपली इच्छा होती, असे म्हणत त्यांनी राज्यसभेत जाण्याचा निर्णय घेतला. आज, 16 मार्च रोजी त्यांची राज्यसभेवर रीतसर निवड होईल. नितीश कुमार यांच्या जागी सम्राट चौधरी यांना मुख्यमंत्री करण्याचा भाजपाच्या गोटात विचार सुरू आहे. नितीश कुमार यांचे दिल्लीत जाणे म्हणजे बिहारमधील जनतेचा अपमान आहे, असे राज्यातील विरोधी पक्षांचे मत आहे. लोकांनी नितीश कुमार यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी जनादेश दिला होता, असे विरोधकांचे म्हणणे आहे. बिहारची सत्ता भाजपाच्या हातात जाऊ नये, असे विरोधकांचे मत आहे. परंतु भाजपाच्या ताब्यात पहिल्यांदा बिहार जाणार आहे. मुख्यमंत्री कोणीही झाले, तरी बिहारमध्ये दिल्लीचा हस्तक्षेप राहणार असल्याचे स्षट होऊ लागले आहे. याकडे जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी लक्ष वेधले आहे. बिहारची सूत्रे दिल्ली आणि गुजरातकडे जातील, अशी उपरोधिक टिप्पणी प्रशांत किशोर यांनी नुकतीच केली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सत्ता राखली, तरी नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, असे भाकीत प्रशांत किशोर यांनी केले होते. याचा संदर्भही त्यांनी दिला. “प्रारंभी माझे भाकीत खोटे ठरल्याचे वाटत असेल. मात्र, माझ्या भाकितानंतर चार महिन्यांतच नितीश कुमार पायउतार होण्याच्या स्थितीत आहेत. आता बिहारमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार येईल. त्याचे नियंत्रण दिल्लीत बसलेल्या गुजरातींकडे असेल. त्यामुळे नवे सरकार बिहारच्या हितासाठी कार्य करण्याविषयी साशंकता वाटते.” पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केवळ मतप्राप्तीसाठी बिहारमध्ये आले. त्यांची खेळी न समजल्याची केलेली चूक आता बिहारी जनतेच्या ध्यानात येईल, असे किशोर म्हणाले. प्रशांत किशोर जे काही म्हणत आहेत, ते काही चुकीचे ठरत नाही. बिहार ताब्यात घेण्याची भाजपाची महत्त्वाकांक्षा होती. राममंदिर चळवळीचा एक भाग म्हणून भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांनी 1990 मध्ये देशभर रथयात्रा काढली होती. त्यावेळी बिहारचे मुख्यमंत्री तत्कालीन जनता पक्षाचे दलाचे नेते लालू प्रसाद यादव होते. लालू प्रसाद यादव यांनी रथयात्रा अडवून अडवाणी यांना अटक केली होती. याचे शल्य भाजपाला बोचत होते, तेव्हापासून भाजपाचा बिहारवर डोळा आहे. भाजपाने ऐनकेनप्रकारेण बिहारची सता ताब्यात घेण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. बिहारमधील मित्रपक्षांना भाजपाकडून कशी वागणूक मिळेल, हे काही सांगता येणार नाही. मात्र, बिहारवर एकहाती राज्य करण्याचा प्रयत्न भाजपाचे नेतृत्व करेलच. मित्र पक्षांतील घराणेशाही भाजपाने बिहारमध्ये खपवून घेतली आहे. त्यामागे हेच कारण दिसत आहे. ‘बिहारी घराणेशाही‘ या मथळ्याखाली 5 मार्च रोजी याच सदरात विविध पक्षांतील घराणेशाहीचा ऊहापोह केला होता. भाजपाचे एकदा वर्चस्व प्रस्थापित झाले, तर लहान जनता दल युनायटेड, हिंदुस्तान अवामी मोर्चा, लोक जनशक्ती इत्यादी पक्षांच्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.

Who rules Bihar?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *