हाराष्ट्रात धर्माला फार महत्त्व दिले जाते. धर्मतेज जागवणारा पंढरीचा विठोबा हा महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर आहे. काही जण म्हणतात, ‘हा धनगरांचा देव आहे. हा मूळ ‘आदिम’ (आदिवासी), अ-नागर देवच पुढे धनगरांसह ‘पंडरिगे’ या गावी आला आणि पुढे तो ‘पांडुरंग’ झाला.’ पंडरिगे या गावाची ‘पंढरी’ झाली. पूर्वी तेथे धनगरांच्या वस्त्या होत्या; परंतु नंतर नागरवस्तीमुळे पुढे या पंढरीला ‘पंढरपूर’ या नावाने संबोधण्यात येऊ लागले. अशा रीतीने पंढरीचे पंढरपूर झाले. पुंडलिकाच्या वेळी पंढरपूरला स्थापन झालेली पांडुरंगाची ही मूर्ती पुढे कर्नाटकातील विजयनगरच्या राजाने त्याच्या साम्राज्यात नेली. त्याने त्या मूर्तीची तुंगभद्रेच्या तीरावर स्थापना केली. त्याकाळी महाराष्ट्रातील पैठण येथील संत भानुदास (संत एकनाथ महाराज यांचे आजोबा) हे विठ्ठलाचे मोठे भक्त होते. त्यांचा आध्यात्मिक अधिकार मोठा होता. एकदा विठ्ठलाने प्रसन्न होऊन त्यांना दृष्टान्त दिला आणि ‘मी कर्नाटकात आहे. तू मला पंढरपुरात नेऊन माझी स्थापना कर’, असे त्यांना सांगितले. विठ्ठलाने सांगितल्याप्रमाणे संत भानुदास यांनी विजयनगरच्या राजाकडे जाऊन विठ्ठलाच्या मूर्तीची मागणी केली. राजालाही दृष्टान्त झाला होता. त्यामुळे संत भानुदासांचे विठ्ठल प्रेम आणि भक्ती पाहून राजाने ती मूर्ती त्यांना दिली. संत भानुदासांनी ती मूर्ती पंढरपूरला आणून तिची प्रतिष्ठापना केली.
पांडुरंग हा शैव आणि वैष्णव दोघांचाही देव आहे. याला शैव आणि वैष्णव दोघेही भजतात. शैव पंथीय पांडुरंगाला ‘वीरभद्र’ म्हणजेच ‘विठ्ठल’ म्हणतात, तर वैष्णव त्याला ‘गोपाळकृष्ण’ असे म्हणतात. तो विष्णू आणि शिव यांचा अवतार आहे; म्हणूनच तो ‘हरिहर’ आहे. असा हा पांडुरंग श्रीकृष्णाचाच अवतार आहे. काही जण ‘विठ्ठल हा भगवंताचा नववा अवतार बुद्ध आहे’, असेही म्हणतात. (आद्य शंकराचार्यांच्या काळात भारतात काही नवीन धार्मिक प्रवृत्तींचा उदय होऊन जैन, बौद्ध इत्यादी धर्मपंथ उदयास आले होते. महाराष्ट्रातही बौद्ध धर्माचा प्रभाव असल्याचे दिसून येते. कारण कोकण किनारपट्टी, घाटमाथा, मराठवाडा येथील सह्याद्री पर्वताच्या रांगांमध्ये बुद्धाच्या कलाकृती असलेल्या गुंफा दिसतात) जैन विठ्ठलाला ‘तो बाविसावा तीर्थंकर नेमिनाथ आहे’, असे मानतात. नेमिनाथ आणि कृष्ण हे दोघेही गोपाळच होते. ते यदुकुलोत्पन्नच होते. नेमिनाथ हाही विठ्ठलासारखा वर्णाने सावळा होता. नेमिनाथांचे शंख हे चिन्ह विठ्ठलानेही धारण केले आहे. त्यामुळे या सर्व लक्षणांवरून ‘विठ्ठल हा दिगंबर नेमिनाथ असावा’, असे जैनांचे मत आहे.
दक्षिणेला हाच गोपाल ‘श्रीव्यंकटेश ऊर्फ तिरुपती बालाजी’ म्हणून प्रसिद्ध आहे. कारण व्यंकटेशाची पत्नी पद्मावती आहे, तर विठ्ठलाच्या पत्नीचेही नाव पद्मावती (पदुबाई) आहे. व्यंकटेशाची पत्नी पद्मावती त्याच्यावर रुसून तिरुयानूर येथे चिंचेच्या वनात राहायला गेली, तर विठ्ठलाची पत्नी रुक्मिणी ही दिंडीर वनात (चिंचेच्या वनात) जाऊन बसली होती. ‘विठ्ठलाला ‘पांडुरंग’ म्हणतात, तसेच व्यंकटेशालाही कर्नाटकातील पर्वताच्या स्थलनामावरून ‘वेंगडम्’ असे म्हणतात. त्यामुळेच त्याला ‘विठ्ठलेश्वर अथवा व्यंकटेश’ असेही म्हणतात. कुरूबा (‘कुरूबा’ समाज हा धनगर पोटजातींपैकी एक आहे.) आणि धनगर यांचा देव एकरूप होऊन त्यातून ‘विठोबा’ निर्माण झाला. शिला प्रतिमेतून ही जी सांगोपांग मूर्ती घडली, ती मात्र या दोन्ही जमातींनी शतकानुशतके त्याच रूपात जपून ठेवली असली पाहिजे; म्हणूनच विठ्ठल आणि तिरुपती या दोन्ही मूर्तींत पुष्कळ साम्य आढळते. पंढरीचा विठोबा दोन्ही हात कटीवर ठेवून उभा आहे, तर कर्नाटकात तो एक हात कटीवर आणि दुसरा हात वरद मुद्रेत असलेला अशा स्वरूपात अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. त्यामुळेच संतांनी ‘सावळा हो विठ्ठलु कर्नाटकु’, असे त्याचे वर्णन केले आहे. संतांनी त्याला ‘कानडा’ म्हणूनही हाक मारली आहे. चैतन्याची ज्या अनुसंधानातून आराधना केली जाते, त्या स्वरूपात ते प्रगट होते. ज्याचा जसा भक्तिभाव असेल, तशी त्याला देव अनुभूती देतो. बंगालमधील कोलकाता येथील कोळ्यांच्या राणीने दक्षिणेश्वरीदेवीची स्थापना केली होती. त्या देवळात तिने श्रीरामकृष्ण परमहंस यांची पुजारी म्हणून नियुक्ती केली होती. श्रीरामकृष्ण परमहंस यांच्या भक्तिभावामुळे देवी त्यांच्यावर प्रसन्न झाली आणि तिने त्यांना दर्शन दिले. अनेकांना वाटते, ‘दगडात देव असतो का?’; परंतु ‘भक्तिभावाने दगडालाही पाझर फुटतो’, हे ध्यानात घ्यायला हवे.
पांडुरंग हे सामान्यांचे दैवत आहे. पांडुरंगाचा रंग सावळा आहे आणि कृष्णही सावळाच आहे. काळा रंग हा अद्वैताचा आहे. वृंदावनातील गोपी कृष्णाला म्हणत, “अरे कृष्णा, तू अमावस्येला अंगावर काळी घोंगडी घेऊन यमुनाकाठी कदंब वृक्षावर बसलास की, तू आम्हाला दिसतच नाहीस. कारण रात्र काळी, यमुना काळी, तू काळा आणि घोंगडीही काळीच! अशा वेळी हे सर्व अद्वैत होऊन जाते.” संत ज्ञानदेव म्हणतात, ‘तुज सगुण म्हणों कीं निर्गुण रे। सगुण निर्गुण एकु गोविंदु रे।’ म्हणजेच तो सगुण आहे आणि निर्गुणही आहे. त्याचे सगुण स्वरूप हे निर्गुणच आहे. तो स्वच्छ म्हणजे निर्मळ आहे. त्याची इंद्रिये विकाररहित आणि स्वच्छ आहेत. तो आत-बाहेर स्वच्छ आहे; म्हणून तो ‘पांडुरंग’ आहे. एकदा लहानपणी संत ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाई खेळत असताना मुक्ताबाई ज्ञानदेवांना म्हणाली, “अरे दादा, तू या पांडुरंगाला निर्गुण म्हणतोस; परंतु हा तर सगुण स्वरूपात येथे कटीवर हात ठेवून उभा आहे.” त्यावर संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, “मुक्ता, मी तुला गुरुमुखातून सांगतो. अगं, हा निर्गुणी बुंद (बिंदू) सगुणी उतरला आहे.” एकूणच हा निर्गुणच सगुण स्वरूपात इथे दिसत आहे. तो कष्टकरी, शेतकरी, सामान्यजन आणि अनाथ यांचा कैवारी आहे; म्हणून तो (उन्हात कष्ट करून रापलेला असा) काळ्या रंगाचा झाला आहे.
असा हा सगुण-निर्गुणरूपी पांडुरंग आहे. कोणत्या तरी विशिष्ट वारीला, तिथीला अथवा कोणत्या तरी मासात विशिष्ट देवतांची स्पंदने पृथ्वीवर अधिक प्रमाणात कार्यरत असतात. तो काळ त्या देवतेचा काळ मानला जातो. उदा. शिवाचा सोमवार, दत्ताचा गुरुवार, तशी श्रीविष्णूची एकादशी. वर्षभरात 24 वेळा येणार्या एकादशींच्या तुलनेत आषाढ व कार्तिक मासांतील शुक्ल पक्षात येणार्या एकादशींच्या वेळी श्रीविष्णूचे तत्त्व पृथ्वीवर अधिक प्रमाणात येत असल्याने श्रीविष्णूशी संबंधित या दोन एकादशींचे महत्त्व अधिक आहे.
(संदर्भ : सनातन डॉट ऑर्ग)