राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांचा सवाल
देवळा ः प्रतिनिधी
कसमादे परिसराचे वैभव असलेला वसाका बंद पाडण्यास जबाबदार असणार्यांवर आजपर्यंत कार्यक्षेत्रातील कोणत्याही लोकप्रतिनिधींनी कुठल्याही कारवाईची मागणी का केली नाही? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ते उदयकुमार आहेर यांनी उपस्थित केला. येथील आमदार, खासदारांनी शासन स्तरावर हा प्रश्न उपस्थित करत कर्जाच्या खाईत गेलेला वसाका पुन्हा सुरू करावा, अशी मागणी रविवारी (दि.15) येथील पत्रकार परिषदेत केली.
वसाका सुस्थितीत असताना अनेक आरोप-प्रत्यारोप करत अनेकांनी सत्ताकेंद्रे हस्तगत करत उपभोगली. मात्र, हे होत असताना वसाका बंद पाडण्यास तसेच वसाकाच्या दुरवस्थेस कारणीभूत कोण, याची कारणमीमांसा करण्याची गरज आहे. कारण या बंद पडलेल्या वसाकामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून, परिसरातील उद्योग-व्यवसाय ओस पडू लागले आहेत. वसाकाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींसह कार्यक्षेत्रातील लोकप्रतिनिधींनी शासनदरबारी आपले वजन खर्च करावे. शिखर बँकेच्या माध्यमातून वसाकावरील असलेल्या कर्जाचे पुनर्गठन करण्याची जबाबदारी शासनाला देऊन शासनामार्फत कारखान्याला कर्ज स्वरूपात निधी उपलब्ध करून द्यावा. अन्यथा आपण सर्व घटकांना सोबत घेऊन वसाकाची चाके पुन्हा फिरती होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन शासनाच्या वतीने वसाकाचे पालकत्व स्वीकारण्याची गळ घालू, असे सांगितले. कर्जबाजारी झाल्यामुळे कारखाना विक्रीस काढणे हा पर्याय होऊ शकत नाही आणि तो जास्त दिवस बंदही ठेवता येणार नाही. यासाठी विशेषतः सभासदांनी, कामगारांनी, तसेच युवावर्गाने वसाका सुरू होण्यासाठी प्रयत्नशील व्हावे, असे आवाहन केले. आपण स्वतः वसाकाची चाके पुन्हा फिरण्यासाठी आग्रही मागणी करणार आहोत. गेले अनेक दिवस वसाकासंदर्भात आंदोलने झाली. अनेक बैठका पार पडल्या. मात्र, लोकप्रतिनिधी कमी पडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.