नाशिकमधील लॉजिस्टिक्स पार्कला विलंब का?

खा. वाजे : प्रकल्प कागदावरच असल्याचे आले समोर

नाशिक : प्रतिनिधी
नाशिकच्या औद्योगिक, कृषी आणि निर्यात क्षमतेला चालना देणारा मल्टी-मोडल लॉजिस्टिक्स पार्क प्रकल्प अजूनही मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचे स्पष्ट होताच खासदार राजाभाऊ वाजे यांनी मंगळवारी (दि.16) लोकसभेत केंद्र सरकारला जाब विचारला. 850 कोटी खर्चाचा हा प्रकल्प अद्याप ‘अ‍ॅप्रेझल स्टेज’वर अडकलेला असून, प्रत्यक्ष कामकाज कधी सुरू होणार, असा सवाल उपस्थित केला. दरम्यान, यावेळी सरकारकडे ठोस उत्तर नसल्याचे समोर आले.
खा. वाजे यांनी वाणिज्य व उद्योग मंत्रालयाकडे उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी नाशिकमध्ये मल्टी-मोडल लॉजिस्टिक्स पार्क प्रस्तावित असल्याची कबुली दिली. मात्र, हा प्रकल्प अद्याप मंजूर झालेला नाही आणि मंजुरीनंतर पहिला टप्पा पूर्ण होण्यासाठी किमान तीन वर्षांचा कालावधी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नाशिक हे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, प्रमुख राष्ट्रीय महामार्ग, देशाला जोडणारे रेल्वेमार्ग, तसेच जेएनपीटी बंदरापासून सुमारे 220 किमी अंतरावर असलेले अत्यंत रणनीतिक ठिकाण आहे. शिवाय द्राक्षे, कांदा, डाळिंब, भाजीपाला अशा कृषी उत्पादनांच्या निर्यातीसाठी नाशिक देशातील आघाडीचा जिल्हा मानला जातो. असे असतानाही या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत होत असलेला विलंब नाशिकच्या आर्थिक विकासावर थेट घाला घालणारा असल्याचे मत खा. वाजे
यांनी मांडले.
खा. वाजे यांनी विचारलेल्या या प्रश्नांमुळे नाशिकच्या शेतकरी, उद्योजक आणि निर्यातदारांच्या प्रश्नांना संसदेत राष्ट्रीय व्यासपीठ मिळाले आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे, नाशिकसारख्या जिल्ह्यासाठी प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पाचा रोजगारनिर्मिती, वाहतूक खर्चात कपात आणि स्थानिक उद्योगांवरील परिणाम याबाबत कोणताही स्वतंत्र अभ्यास अद्याप करण्यात आलेला नाही, असेही मंत्रालयाच्या उत्तरातून स्पष्ट झाले. चेन्नई, बेंगळुरू, नागपूर आणि इंदूर येथील प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरच असा अभ्यास केला जाईल, असे सरकारने सांगितले. एकीकडे गतीशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन अंतर्गत लॉजिस्टिक्स सुधारण्याची घोषणा केली जाते, तर दुसरीकडे नाशिकसारख्या सक्षम जिल्ह्याचा प्रकल्प वर्षानुवर्षे रखडतो. ही केंद्र सरकारच्या धोरणात्मक विसंगतीची जिवंत उदाहरणे असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

लॉजिस्टिक पार्क हा नाशिकसह उत्तर महाराष्ट्रासाठी गेमचेंजर तर ठरणारच आहे. परंतु, देशाच्या एकूण दळणवळणात एक महत्त्वाची भूमिका बजावणारा ठरू शकतो. यासाठी पाठपुरावा करताना काही बाबी लक्षात आल्या. त्यामुळे थेट लोकसभेच्या पटलावरच हा विषय मांडला. इंदूर, नागपूर, चेन्नई, बंगळुरू यांच्यानंतर नाही तर यांच्यासोबतच नाशिकचेही लॉजिस्टिक पार्क उभे राहावे, अशी आग्रही मागणी आहे.
खा. राजाभाऊ वाजे, नाशिक

Why is the logistics park in Nashik delayed?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *