अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीचा खून

 पतीचीही गळफास घेत आत्महत्या
चुंचाळे घरकूल योजना येथील खळबळजनक घटना
नाशिक – (विशेष प्रतिनिधी)
अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीवर चाकूचे सपासप वार करत खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी सायंकाळी अंबडमधील चुंचाळे शिवारातील घरकूल योजनेत घडली. पत्नीला संपवल्यानंतर पतीनेही गळफास घेत आत्महत्या केली. याघटनेने घरकूल योजनेतील रहिवाश्यांना धक्का बसला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुजंग अश्रू तायडे (वय ३५) व मनिषा भुजंग तायडे (वय २५) अशी या दाम्पत्याची नावे आहेत. ते मुळचे विदर्भातील मेहेकर (जि. बुलढाणा) येथील असून कामानिमित्ताने नाशिकमध्ये आल्यानंतर चुंचाळे घरकूल येथे वास्तव्यास होते.
परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय पतीला होता. त्यावरून दोघांमध्ये यापूर्वीही वाद झाले होते. बुधवारी सायंकाळी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्याचे पर्यावसन खून व आत्महत्येत झाले. पतीने पत्नी मनिषा हिच्यावर चाकूने सपासप वार करून तिला संपवले. पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर भानावर आलेल्या भुजंगने घरातच किचनमधील फॅनच्या हुकाला गळफास घेऊन स्वतःलाही संपवले. ही घटना कळताच अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक युवराज पत्की, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक वसंत खतेले कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. तायडे दाम्पत्याला दोन मुले असून एक मुलगा सातवीत तर दुसरा मुलगा नववीत शिक्षण घेत आहे. दरम्यान या घटनेमुळे घरकुल योजना परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *