पाणी वितरणाच्या योग्य नियोजनाचे आयुक्तांकडून आश्वासन
मालेगाव : प्रतिनिधी
संगमेश्वर परिसरातील काकूबाईचा बाग भागात अनियमित पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे महिलावर्ग त्रस्त झाला आहे. या भागात पाणीवाटपाचे नियोजन करावे, या मागणीसाठी सार्वजनिक नागरी सुविधा समितीच्या नेतृत्वाखाली महिलांनी महापालिकेवर हंडा मोर्चा काढला. यावेळी आयुक्तांनी नियोजन करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
गेल्या अनेक दिवसांपासून काकूबाईचा बाग, खलीलशेठ चाळ व संगमेश्वरातील इतर परिसरात नियोजित वेळेनुसार पाणीपुरवठा न होता वेळ खंडित करून सुमारे 12 ते 15 तास उशिराने पाणी दिले जात आहे. दुपारी तीनला होणारा पाणीपुरवठा हा पहाटे तीनला केला जातो. त्याबाबत कोणतीही सूचना दिली जात नाही. नागरिक झोपेत असतात व नळास पाणी येऊन निघून जाते. काम करून थकलेल्या महिला सकाळी उठून पुन्हा पाण्याच्या शोधार्थ फिरावे लागते. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी सार्वजनिक नागरी सुविधा समितीचे रामदास बोरसे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर हंडा मोर्चा काढला. यावेळी आयुक्त जाधव यांनी आंदोलक महिलांची भेट घेत समस्या जाणून घेतल्या. यावेळी महिलांनी आयुक्तांवर प्रश्नांचा भडिमार केला. पाण्यासंदर्भात संबंधित अधिकार्यांना विचारपूस केली असता वेळकाढूपणा करून उडवाउडवीची उत्तरे देतात. एक-दोन वेळेस पाणी नियोजन बिघडल्यास समजू शकतो. परंतु जर सातत्याने अवेळी पाणी दिले जात असेल तर ती बाब योग्य नसल्याचे महिलांनी सांगितले. यावेळी आयुक्त जाधव यांनी समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. यावेळी भारत पाटील, फारुकभाई कच्छी, कैलाश शर्मा, गोपाळ सोनवणे, गजानन येवले यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.