दोन वर्षांपासून वावी-घोटेवाडी रस्त्याचे काम रखडले

ग्रामस्थ संतप्त; ठेकेदारावर कारवाईची मागणी

सिन्नर : प्रतिनिधी
नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांना जोडणारा तालुक्यातील वावी-घोटेवाडी रस्ता दोन वर्षांपासून रखडल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा कार्यारंभ आदेश 16 मार्च 2024 रोजी देण्यात आला होता. काम पूर्ण करण्यासाठी 12 महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. मात्र, दोन वर्षे उलटूनही प्रत्यक्ष काम सुरू झालेले नसल्याने रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे.

यासंदर्भात घोटेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच तथा प्रशासक मंजुश्री भरत घोटेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेलद्वारे तक्रार पाठवून संबंधित ठेकेदारावर कारवाई करून काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांना जोडणार्‍या या महत्त्वाच्या मार्गावरून वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. याच मार्गावरून सुमारे 100 हून अधिक विद्यार्थी दररोज वावी येथील विद्यालयात शिक्षणासाठी प्रवास करतात. मात्र, गेल्या वर्षी ठेकेदाराने रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या साइडपट्ट्या भरून काम अर्धवट सोडल्याने रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. संबंधित ठेकेदाराकडे वारंवार पाठपुरावा करूनही तो अधिकार्‍यांना जुमानत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शासनाकडून निधी मिळत नसल्याचे कारण देत दोन वर्षे उलटूनही काम सुरू करण्यात आलेले नाही. शिवाय, सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर रस्त्यावर खडीचे ढिगारे टाकून ठेवण्यात आल्याने प्रवास अधिक धोकादायक बनला आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
सरकारकडे निधी नव्हता तर कामाला मंजुरी का देण्यात आली, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. कार्यारंभ आदेश होऊनही दोन वर्षे काम सुरू न झाल्याने प्रशासनाने संबंधित ठेकेदाराकडून काम काढून घेऊन दुसर्‍या क्रमांकाच्या ठेकेदाराला देण्याची कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न चंद्रभान घोटेकर, व्यावसायिक अमर कवाडे, कैलास गुंजाळ आदींनी उपस्थित केला.

असे आहे कामाचे स्वरूप

कामाचा लेखाशीर्ष : 5054,

रस्त्याची लांबी : 0 ते 5 किमी

प्रशासकीय मंजुरी : 3 कोटी रुपये

निविदा रक्कम : 2,30,12,339,

मंजुरी आदेश : 16 मार्च 2024

काम पूर्ण करण्याचा कालावधी : 12 महिने

मुख्यमंत्र्यांकडून सचिवांना सूचना

वावी-घोटेवाडी रस्त्याच्या रखडलेल्या कामाबाबत सरपंच मंजुश्री घोटेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेलद्वारे तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी सदर ई-मेल सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव मिलिंद म्हैसकर यांना अवगत करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे. आता बांधकाम विभाग त्यावर काय कार्यवाही करते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Work on Vavi-Ghotewadi road stalled for two years

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *