कोकण विभाग नंबर वन, नाशिक विभागाचा टक्का घसरला
नाशिक/पुणे ः प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा राज्याचा निकाल 91.88 टक्के लागला. यंदाही विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनींनीच बाजी मारली आहे. सन 2027-28 पासून नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. त्यानुसार दहावी-बारावीच्या परीक्षेची कार्यपद्धती ठरविण्यात येईल, अशी माहिती राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 1.49 टक्के निकाल कमी लागला आहे. राज्यात कोकण विभागाचा सवार्ंत जास्त, तर लातूर विभागाचा सर्वांत कमी निकाल लागला आहे. पुनर्परीक्षेचा निकाल 37.65 टक्के लागला. दिव्यांगांना सवलतीचे गुण देण्यात आले आहेत. यंदाही परीक्षेत मुलींनी बाजी मारली असून, राज्यात 94.58 टक्के विद्यार्थिनी, तर 89.51 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांपेक्षा 5.07 टक्के अधिक विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत.
बारावीच्या परीक्षेत यश मिळविलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी अभिनंदन केले आहे. देशाचे भविष्य असलेल्या या विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
विदर्भकन्या राज्यात पहिली, मितालीला 99 टक्के गुण
राज्यात 12 वी परीक्षेच्या निकालात मुलींनी बाजी मारली असून, प्रथम येण्याचा मानदेखील विदर्भकन्येला मिळाला आहे. मिताली (594/600) गुण मिळवत राज्यात प्रथम आली.तीन विषयांत तिला 100 पैकी 100 गुण मिळाले आहेत. मितालीने फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित या विषयांत 100 पैकी 100 गुण मिळवत 100% गुण प्राप्त केले आहेत.
बारावीची परीक्षा हा विद्यार्थ्याच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा आहे. या परीक्षेतील यशानंतर आपल्या आवडीनुसार विविध क्षेत्रांत वाटचाल करण्याचा मार्ग खुला झाला आहे. स्वतःसह देशाची प्रगती साधण्याची संधी मिळणार आहे. परीक्षा हे अंतिम ध्येय नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना यश मिळाले नाही त्यांनी उमेदीने अभ्यासाला लागावे आणि यश संपादन करावे.
– दादाजी भुसे, शालेय शिक्षणमंत्री