काही गोष्टी आयुष्यात जुळवून घेणं एक आणि काही गोष्टी आयुष्यात जुळून येणं एक..हे जुळून येणं जरी सहज भासल तरी ती सहजता मनाच्या हिंदोळ्यावर आपल्याला स्मितहास्य देतांना दिसते,आणि ह्यास आपण आयुष्यातील योगायोग म्हणून जवळ करतो.हा योगायोग काळाच्या चक्रात कधीच स्वतःला जखडून ठेवत नसावा बहुतेक,म्हणून की काय त्याचं अस्तित्व प्रत्येकासाठी आनंदाच्या सरी सोबत घेऊन येत.आपल्या मनीच्या सुप्त आकांक्षा आणि हा योगायोग यांची मैत्री फारच जुनी असावी.त्यांचं एकत्र होऊन वास्तवात उतरण ही गोष्टच मनास सुखाची चाहूल लागण्यासाठी परावृत्त करत असते.
योगायोग हा आपल्या स्वप्नांची पाऊलवाट परखत असावा अगदी नकळत..म्हणूनच,कदाचित योगायोग घडवला जात नाही तो घडून येतो.काही क्षण,प्रसंग जगणं आपलं स्वप्न असत,पण ह्याच क्षणांना आपल्याला भेटण्याची ओढ लागावी ही गोष्टच मुळात त्याच क्षणांना कणभर सोनेरी करून जाते.हे सोनेरीपण उजळवण्यासाठी हा योगायोग किती नितळपणे त्याची उपस्थिती प्रस्थापित करतो.
कधी माणसांच्या स्वरूपात तर कधी कुठल्या प्रसंगांच्या स्वरुपात हा योगायोग आपला अगदी लाघवी पाठलाग करतांना दिसतो.तर कधी आपल्यातल्याच अनामिक आशांना सत्यात उतरवून आपल्याच अस्तित्वाची खून सिद्ध करत असतो.योगायोग ही आयुष्य रंगीत करणारी एक अशी पहाट आहे जिचा जन्म होतांना बघणं बऱ्याचदा अनुभवणं राहून जात,पण तो मनात अनुभवला तरी आपल्या अंतःकरणास प्रसन्न करून जातो.आयुष्यात बऱ्याच गोष्टी सुटतात काही अगदी सहज आपल्या सोबत राहतात,पण ज्या गोष्टी अप्रत्यक्षपणे आपल्यातल्या आनंदाला खत पाणी घालण्यासाठी सहज आजूबाजूस दरवळत असतात त्या मात्र जगण्यातली गोडी द्विगुणित करणाऱ्या ठरतात, त्यापैकीच एक म्हणजे हा “योगायोग”..
तेजश्री गोडसे