दृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा एक भक्कम पुरावा म्हणजे पंढरपूर! वैकुंठभुवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले. त्यामुळे पृथ्वीवरील सर्वांत पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो. त्यासंदर्भात एक ओवी आहे, आधी रचिली पंढरी, नंतर वैकुंठ नगरी। संत नामदेव महाराजही आपल्या अभंगात सांगतात, जेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर। पृथ्वीवरील केवळ दोनच तीर्थक्षेत्रे नाश न पावणारी आहेत. एक म्हणजे काशी आणि दुसरे म्हणजे पंढरपूर. कारण या क्षेत्रांचा अविनाशी तत्त्व असा महिमा भगवान शंकर आणि विष्णू यांनी आपल्या अखंड वास्तव्याने कथन केला आहे.
काशीमध्ये शंकराचे आणि पंढरपूरमध्ये विष्णूचे स्थूल रूपात अस्तित्व आहे. म्हणूनच प्रत्येक हिंदू इहलोकाची यात्रा संपवण्यापूर्वी एकदा तरी काशीस अथवा पंढरपूरला जावे, अशी इच्छा बाळगून असतो. अशी थोरवी प्राप्त झालेले हे पंढरपूर तीर्थक्षेत्र आहे. पृथ्वीवरी तीर्थे असती अपार। परी पंढरीची सर। एकाही नाही ॥ असा दाखला संत नामदेव महाराज देतात, तर न करी आळस। जाय पंढरीशी। अवघी सुखराशी। तेथे आहे॥, असे संत चोखामेळा यांनी म्हटले आहे. काशीच्या पाच यात्रा, द्वारकेला तीन वेळा जाणे, या दोन्ही यात्रांनी जेवढे पुण्य मिळते, तेवढेच पुण्य एका पंढरपूरच्या वारीने मिळते. सर्व सुखाचे आगर आणि संत मंडळींचे माहेरघर असल्यानेच अवघी दुमदुमली पंढरी। भगव्या पताका खांद्यावरी। तुळशी वृंदावन डोक्यावरी। भाव भुकेल्यांची ही वारी।, असे म्हटले जाते.
संत ज्ञानेश्वरांनी वारी या व्रताचा प्रारंभ केला. तेव्हापासून चालू असलेल्या वारीमुळे पंढरपुरातील श्रीविठ्ठलाची मूर्ती जागृतावस्थेत आली आहे. वारकरी राम कृष्ण हरी। असे नामसंकीर्तन सतत करत पंढरीस जातात. कलियुगात ईश्वराची कृपा संपादन करणार्या एका व्यक्तीपेक्षा सर्व मिळून जेव्हा कृपा संपादनाचा प्रयत्न करतात, तेव्हा ती समष्टी साधना होते. वारीमध्ये व्यष्टीसह समष्टी साधनाही होते आणि सर्व जीवांच्या उद्धारासाठी विठ्ठलाला पंढरपुरात भूतलावर यावेच लागते. या तीर्थाचा महिमाच असा आहे.
येथील भक्तांच्या तळमळीमुळे विठ्ठलाला पंढरपुरात यावेेच लागते. पंढरपूरच्या वारीने आपल्या जीवनात भक्तीचा अखंड झरा पाझरू लागतो. भावभक्तीचे बीज प्रत्येकाच्या अंतर्मनात रुजवणारी ही वारी पृथ्वीच्या अंतापर्यंत अशीच चालू राहणार आहे. भक्तांच्या संकटसमयी धावून येण्यासाठी, आपल्या भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी विठ्ठल पंढरपुरात उभा आहे. देव भावाचा भुकेला आहे, याची प्रचीती घ्यायची असल्यास पंढरपूरला जावे. शिस्तीचे दर्शन हे पालख्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. प्रत्येक दिंडीची रचना ठरलेली आहे. प्रारंभी भगवे ध्वजधारी वारकरी, मग तुळशीवृंदावन घेतलेल्या महिला, त्यामागे टाळकरी, नंतर विणेकरी अशीच सर्व दिंड्यांची रचना असते. टाळ वाजवणार्या वारकर्यांचा पदन्यासही लयबद्ध असतो. भले टाळकरी-वारकरी शेकडोंच्या संख्येने का असेना! वैयक्तिक जीवनातील अभिनिवेश बाजूला ठेवून ईश्वराच्या नामस्मरणात देहभान विसरायला लावणारा आध्यात्मिक सोहळा म्हणजे पंढरपूरची वारी!
श्रीक्षेत्र आळंदी आणि देहू येथून निघणार्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या म्हणजे महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव! ऊन-पावसाची तमा न बाळगता भगवी पताका खांद्यावर घेऊन टाळ-मृदंगाचा गजर करत चालणारे वारकरी म्हणजे भावभक्तीचेच प्रतीक! कोणाच्याही तोंडवळ्यावर चिंता नाही की मुक्कामाच्या ठिकाणी सोयीसुविधांची अपेक्षा नाही. वारकर्यांना प्रतिदिन 10 ते 20 किलोमीटरचा टप्पा चालत पार करावा लागतो. सकाळी लवकर मार्गस्थ व्हावे लागते. अल्पोपाहार आणि महाप्रसादही वाटेतच घ्यावा लागतो. सायंकाळी विलंबाने मुक्कामाच्या ठिकाणी पोचल्यानंतर भजन-कीर्तन होऊन दिवसाची समाप्ती होते.विठुमाउली तू माउली जगाची। माउलीच मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा॥ असा वारकर्यांचा पंढरीच्या विठुरायाप्रति असलेला भाव जगात सुविख्यात आहे.
विठ्ठल विठ्ठल, जय हरि विठ्ठल, असे विठ्ठलाला आळवत वारकरी प्रतिवर्षी वारीला जातात आणि परत आल्यावर स्वतःपुरतीच नव्हे, तर परिसरातही विठ्ठलाची उपासना करतात. वर्षभर प्रपंचात म्हणजेच मायेत गुंतलेल्या जीवाला वारीमार्गात येणारे अनुभव आणि अनुभूती जीवनाचे सार सांगून जातात. वारीच्या अंतिम चरणी जेव्हा पांडुरंगाचे दर्शन घडते तेव्हा तो अनुपम्य सोहळा कधीच संपू नये असे वाटते.
ज्या क्षणी जीव शिवाचे मिलन घडते तो क्षण स्वर्गीय आनंदाचा अनुभव देतो. एरवी आरामदायक चारचाकीतून प्रवास करून पंढरपूरला जाणे आणि वारीत सहभागी होऊन माउलीला भेटणे यातील भेद वारकरीच सांगू शकत. या भेटीला कोणत्याही ऐहिक सुखाची सर नाही. हा आनंद जीवनात एकदा तरी घ्यावा. प्रत्येकाने आयुष्यात एकतरी वारी अनुभवावी.
(संदर्भ : सनातन डॉट ऑर्ग)
जगन घाणेकर
9664559780