हल्ल्याचा प्रतिशोध घ्यावा
‘ पुलवामानंतर पहलगाम’ हा अग्रलेख (गांवकरी २४ एप्रिल) वाचला. पुलवामा येथे दहशतवाद्यांनी जवानांना लक्ष केले होते.२०१९ मध्ये हा हल्ला झाला होता आणि आता पहलगाम मध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्वसामान्य पर्यटकांवर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. काश्मीरमध्ये अशांतता निर्माण झाल्यानंतर आणि हिंसेचे थैमान सुरू झाल्यानंतर देखील दहशतवाद्यांनी पर्यटकांना यापूर्वी फारसे लक्ष्य केले नव्हते. काश्मीर खोऱ्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने अवलंबून आहे ती पर्यटनावर. २०१९ नंतर येथे होणाऱ्या पर्यटनाचा आलेख उत्तरोत्तर उंचावत गेलेला दिसतो. पर्यटनाच्या मोसमात फेब्रुवारीपासून ऑक्टोबर दरम्यान काश्मीर खोऱ्यात जाणाऱ्या पर्यटकांच्या एकूण संख्येने यंदा सव्वा दोन कोटींचा टप्पा ओलांडला. “भारताकडून होणाऱ्या अत्याचारांमुळे अत्यंत हलाखीच्या स्थितीत काश्मिरी राहत आहेत आणि त्यांच्या मुक्तीची गरज आहे”, अशी जगभर बोंब मारत सुटलेल्या पाकिस्तानला जम्मू-काश्मीरची आर्थिक घडी बसण्यास अनुकूल वातावरण निर्माण होणे, तेथे पर्यटकांची गर्दी होणे, हे वास्तव चांगलेच झोंबणारे ठरले. ३७० कलम हटवल्यानंतर तेथे मोठे उद्रेक होतील आणि आपल्या प्रचाराला बळ मिळेल, ही त्या देशाच्या नेत्यांची मनो राज्येही धुळीला मिळाली. दहशतवाद विरोधी लढ्याची भूमिका भारताने आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर सातत्याने मांडली. आतंकवादाला धर्म नसतो, मात्र काश्मीरमध्ये झालेल्या हल्यात आतंकवाद्यांनी पर्यटकांना त्यांचे धर्म विचारून केवळ हिंदूंना लक्ष केले हेही आता स्पष्ट झाले. आतंकवाद्यांनी आजतागायत देशभरात हजारो निरपराध नागरिकांची हत्या केली. स्वातंत्र्यानंतर आजतागायत अनेक सरकारेआली आणि, गेली मात्र आतंकवादाचा बीमोड करणे कोणालाही शक्य झाले नाही. भारतीयांना या हल्याचा प्रतिशोध हवा आहे तोही इस्त्रायल सारखा. भारताने आता इस्त्रायल प्रमाणे बाणेदारपणा अंगीकारला पाहिजे. आंतकवाद्यांच्या आश्रय स्थानावर हल्ला करून त्यांचे समूळ उच्चाटन करणे आणि आतंकवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला कायमची अद्दल घडविणे हाच या हल्ल्याचा प्रतिशोध असून भारताने त्यादृष्टीने सिद्धता करायला हवा.
प्रभाकर वारुळे मालेगाव