राज्यातील 75 टक्के शेतकर्‍यांना दिवसा वीज मिळणार

मुंबई : प्रतिनिधी
सध्या राज्यातील सुमारे 75 टक्के शेतकर्‍यांना कृषिपंपांसाठी नियमानुसार दिवसा आठ तास वीजपुरवठा उपलब्ध झाला आहे. या वर्षाअखेरीस उर्वरित 25 टक्के शेतकर्‍यांनाही दिवसा वीज देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.
राज्यात सध्या कोणतीही वीजटंचाई नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मे महिन्यात तांत्रिक अडचणींमुळे झालेले अल्पकालीन भारनियमन वगळता सध्या राज्यात भारनियमन नाही. या निर्णयामुळे रात्री-अपरात्री शेतात जाऊन पाणी देण्याच्या त्रासातून राज्यातील सर्वच शेतकर्‍यांची लवकरच मुक्तता होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
शेतकर्‍यांना शाश्वत वीज मिळावी आणि वीजबिलाच्या प्रश्नातून त्यांची कायमची सुटका व्हावी, यासाठी शासनाने ’सौर कृषिपंप योजनेवर’ मोठा भर दिला आहे. गेल्या तीन वर्षांत राज्यात दहा लाखांहून अधिक सौरपंप बसविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, भौगोलिक परिस्थितीनुसार नदीकाठ, कालवे आणि खोल जलस्रोतांसाठी मोनोपोल, बूस्टर आणि तरंगत्या सौर पंपांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे. तसेच, पाण्याची पातळी खोल गेलेल्या ‘डार्क झोन’ भागातील शेतकर्‍यांसाठी अधिक क्षमतेचे बूस्टर पंप आणि त्यावर विशेष अनुदान देण्याची व्यवस्था शासनाने केली असल्याने तिथल्या शेतकर्‍यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

 

75 percent of farmers in the state will receive electricity during the day.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *