32 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला, पूरपाण्याने बंधारे भरण्याची शेतकर्यांना प्रतीक्षा
सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील सर्वाधिक साठवण क्षमता असलेल्या चास खोर्यातील म्हाळुंगी नदीवरील भोजापूर धरणात रविवारी (दि.29) सकाळी 90 टक्के पाणीसाठा झाला. परिणामी धरणावर अवलंबून असलेल्या तीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांमध्ये समाविष्ट असलेल्या 32 गावांना दिलासा मिळाला आहे. 361 दलघफू साठवण क्षमता असलेल्या भोजापूर धरणात 325 दलघफू इतका साठा झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत धरणामध्ये केवळ 10 टक्क्यांच्या आसपास पाणीसाठा होता.
धरण पूर्ण भरल्यानंतर लाभक्षेत्रातील गावांमधील तलाव पूरपाण्याने भरून घेण्याची शेतकर्यांना प्रतीक्षा आहे. एप्रिल महिन्यात धरणात केवळ मृतसाठा शिल्लक होता. मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने म्हाळुंगी नदी प्रवाहित झाल्याने धरणात 12 टक्के पाणीसाठा झाला होता. गेल्या पंधरवड्यात म्हाळुंगी नदीच्या लाभक्षेत्रात पडलेल्या जोरदार पावसामुळे हा साठा एकाच दिवसात 65 टक्क्यांवर पोहोचला. त्यानंतर हळूहळू पाण्याची आवक सुरू राहिल्याने हा साठा आता 90 टक्क्यांवर पोहोचला आहे. एखाद दुसरा जोराचा पाऊस झाल्यास धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हर फ्लो होण्याची शक्यता आहे. सध्या पावसाने उघडीप घेतली असली तरी नदीतून धरणात 50 क्यूसेक इतकी पाण्याची आवक सुरू आहे.
सिन्नर तालुक्यातील मनेगावसह 22 गावे, कणकोरीसह पाच गावे, संगमनेरच्या निमोणसह पाच गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना भोजापूर धरणावर कार्यरत आहेत. सिन्नरमधील 27 आणि संगमनेर तालुक्यातील पाच, अशा 32 गावांची तहान भोजापूर धरणातील पाण्यावर भागवली जाते. याशिवाय दोडी येथील चार व नांदूरशिंगोटे येथील एक पाणीवापर संस्था कार्यरत आहे. खरीप आणि रब्बीसाठी या संस्था धरणातील पाण्याचा वापर करतात.
पूर पाण्याच्या लाभासाठी संघटित होण्याची गरज
भोजापूर पूरपाण्यावर पूर्व भागातील दुशिंगपूर तसेच
फुलेनगरचा साठवण तलाव भरून घेण्याचे नियोजन असते. पूरपाणी सोडल्यानंतर या गावांना कधीच पुरेसा लाभ मिळत नाही. हा आजवरचा इतिहास आहे. दोडी, नांदूरशिंगोटे, संगमनेर तालुक्यातील पळसखेडे, निमोण या परिसरात कालव्यांद्वारे पावसाळ्यात पूरपाण्याचा व रब्बी हंगामात शेतीलाही आवर्तनाचा लाभ दिला जातो. यंदा मात्र धरण लवकर भरणार असल्याने सिन्नरच्या पूर्व भागातील शेतकर्यांना पूरपाणी मिळण्याची अपेक्षा बळावली आहे. याउपरही पाटबंधारे विभागाने नेहमीप्रमाणे चलाखी केल्यास हक्काच्या पाण्यासाठी शेतकर्यांना संघटित व्हावे लागणार आहे.
खा. वाजे : शिवसेना कार्यालयात मनसे पदाधिकार्यांची उपस्थिती नाशिक : प्रतिनिधी सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे…
धरण समूहात 47 टक्के; गंगापूर धरणात 56 टक्के पाणीसाठा नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात गेला महिनाभर…
चेन खेचल्याने वीस दिवसांत 98 गाड्यांना विलंब नाशिकरोड : प्रतिनिधी रेल्वेची विनाकारण चेन ओढण्यामुळे 1…
सध्या सुरू असलेल्या पहिलीपासूनच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात आपण सर्व मराठी बांधवांनी जाणून घ्यायला हवे आपल्या मराठी…
पारोळा : एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह…
अभोणा ग्रामपालिकेचे दुर्लक्ष, कचरा डेपोसाठी जागा नसल्याचा जावईशोध अभोणा : प्रतिनिधी देशभर स्वच्छ भारत मिशनचा…