कामाचा समाधानकारक अहवाल नसल्यास कर्मचार्यांवर कारवाई
मालेगाव : प्रतिनिधी
शहरातील वाढत्या मोकाट जनावरांच्या समस्येवर आळा घालण्यासाठी मालेगाव महापालिकेने कारवाई अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नियुक्त दोन पथकांच्या कामगिरीबाबत समाधानकारक अहवाल न आल्यास संबंधित कर्मचार्यांवर थेट कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव यांनी दिला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांची संख्या वाढल्याने नागरिक त्रस्त आहेत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने दोन कायमस्वरूपी पथके नियुक्त केली होती. मात्र, अपेक्षित प्रमाणात जनावरांची धरपकड न झाल्याचे स्पष्ट झाल्याने आयुक्तांनी दोन्ही पथकांच्या कामगिरीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आठवडाभरात जनावरांची संख्या कमी न झाल्यास पथके वाढविण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच दैनंदिन अपेक्षित धरपकड न झाल्यास कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी थेट प्रशासकीय कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यापुढे जनावरे पकडून दंड आकारल्यानंतर पुन्हा तीच जनावरे मोकाट आढळल्यास थेट संबंधित मालकांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे. शिवाय, जनावरे सोडवून घेण्यासाठी राजकीय किंवा सामाजिक दबाव आणण्याचा प्रयत्न करणार्यांवरही शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला जाईल, असा कठोर इशारा आयुक्त जाधव यांनी दिला आहे. या निर्णयामुळे मालेगाव शहरात मोकाट जनावरांच्या प्रश्नी लवकरच सुधारणा होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.