जुने नाशिक परिसरात अनियमित पाणीपुरवठा

संकट गंभीर, निष्काळजीपणामुळे नागरिकांचे मात्र हाल

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून होणारा अनियमित पाणीपुरवठा नागरिकांसाठी मोठी समस्या ठरत आहे. आज, दि. 22 सप्टेंबर 2025 रोजी गुप्तावाडा परिसरात सकाळचा पाणीपुरवठाच झाला नाही, तर इतर भागात अत्यंत कमी दाबाने पाणी आले. गुप्तावाडा परिसरात अनेक वर्षांपासून संध्याकाळी पाणीपुरवठा होत नाही.
गुप्तावाडा, गोरेराम लेन, रविवार पेठ, सराफ बाजार या परिसरातील नागरिकांना सोमवारी सकाळी कमी दाबाने पाणी मिळाले, तर गुप्तावाडा परीसरात पाणीच आले नाही. घनकर लेन जलकुंभातून या भागातील पाणीपुरवठा होत असतो, परंतु अनेक वर्षांपासूनची ही अडचण कायम आहे. गुप्तावाडा परिसरात संध्याकाळी पाणीपुरवठा होत नाही, तर सकाळीही पाणी आले नाही.
विशेषत: सकाळी गृहिणी, शाळकरी मुले व कामावर जाणार्‍या व्यक्तींना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठा व्यवस्थेची दयनीय स्थिती आहे. 5 सप्टेंबर रोजी घनकर लेन जलकुंभ परिसरात पाणीपुरवठा उशिरा झाला होता. 5 सप्टेंबरला सकाळी 7 वाजता आणि 7 सप्टेंबरला सकाळी 7.45 वाजता पाणी आले होते. यावेळी व्हॉल्व्हमनने झोपेची कारणे दिली होती. यापूर्वीही अशी प्रकरणे झाली आहेत. या गंभीर समस्येसाठी सकाळ व संध्याकाळच्या शिफ्टमधील व्हॉल्व्हमनांना जबाबदार धरले जात आहे.
व्हॉल्व्हमन कारणे देत असून, त्यांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. अनेक वेळा तक्रारी करूनही पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी येऊन खड्डे खणून काम केल्याचे भासवत दोन-तीन दिवस पाणीपुरवठा व्यवस्थित होतो. परंतु त्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. नागरिकांना या फसवणुकीचा अनुभव येत असून, कायमस्वरूपी तोडगा न निघाल्याने त्रास सुरूच आहे.

संपूर्ण नाशिक शहरात पाणीटंचाई

केवळ घनकर लेन आणि गुप्तावाडा परिसरच नव्हे, तर जुने नाशिक, पंचवटी विभाग, सिडको, इंदिरानगरसह संपूर्ण नाशिक शहरामध्ये पाणीपुरवठा विभागातील बेजबाबदारी दिसून येतेे. कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा आणि उशिरा येणारे पाणी यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नाशिकची सिंहस्थ कुंभमेळ्यात निर्माण झालेली प्रतिमा या पाणीपुरवठा समस्यांमुळे धूसर होण्याची शक्यता आहे. तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणार्‍या नाशिकमध्ये मूलभूत सुविधांची कमतरता नागरिकांच्या आस्थेवर परिणाम करू शकते.

अद्याप ठोस तोडगा नाही

दररोज वर्तमानपत्रांमध्ये पाणीपुरवठा समस्यांच्या बातम्या येत असल्या, तरी नाशिक महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून अद्याप कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. नागरिकांच्या तक्रारी वाढत असूनही प्रशासन मौन बाळगत आहे. तत्काळ पाणीपुरवठा व्यवस्था सुधारावी, व्हॉल्व्हमनवर कठोर कारवाई करावी, नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा, गुप्तावाडा परिसरात संध्याकाळचा पाणीपुरवठा सुरू करावा, तात्पुरत्या कामांऐवजी कायमस्वरूपी तोडगा काढावा. पाणी हा जीवनाचा आधार असून, या मूलभूत गरजेबाबत प्रशासनाची निष्काळजी चिंताजनक आहे. तक्रारी करूनही तात्पुरते काम करून नागरिकांची फसवणूक करण्याऐवजी स्थायी उपाययोजना करण्याची गरज आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *