येवल्यात उमेदवारांच्या प्रचाराला वेग

मतदारांचा मात्र सर्वांना बाय बाय

येवला नगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीनिमित्ताने शहरात उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर उमेदवारांनी प्रचारात वेग घेतला आहे. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस-महायुतीचे उमेदवार राजेंद्र लोणारी, तसेच शिवसेना शिंदे गट-मित्रपक्षांचे उमेदवार रूपेश दराडे यांच्यात लढत होत आहे. नगरसेवकपदाच्या 26 जागांसाठी 89 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
अर्ज माघारीनंतर निवडणुकीतील उमेदवारांनी आपला प्रचार जनतेच्या दरबारात पोहोचवला आहे. प्रत्येक उमेदवार मतदारांच्या घरी, दुकानात, गल्लोगल्ली समक्ष भेट घेत आहेत. प्रत्येक पक्षाचा उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचला आहे. मतदार मात्र भेट घेणार्‍या उमेदवारांना बाय बाय करताना दिसत आहेत. कोणत्याही उमेदवारांचे मन राखण्यासाठी मतदार ‘सर्वांना आम्ही तुमच्याबरोबर आहोत,’ असे म्हणून सांगताना दिसताहेत. स्थानिक पातळीवरील निवडणूक असल्याने सर्वांचे हितसंबंध, मैत्री जपावीच लागते. प्रचारासाठी उमेदवारांची दमछाक होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भाजप, रिपाइं आठवले महायुती, तसेच शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, मित्रपक्ष यांच्या माध्यमातून उमेदवारांचा प्रचार करण्यात येत आहे. वंचित बहुजन आघाडीच्याही उमेदवारांचा प्रचार सुरू आहे.
काँग्रेस, मनसे या पक्षांच्या वतीने उमेदवार देण्यात आलेले नाहीत. शिवसेना उबाठातर्फे काही प्रभागांत उमेदवार देण्यात आले आहेत. नगराध्यक्षपदाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचे उमेदवार राजेंद्र लोणारी आणि शिवसेना शिंदे गट मित्रपक्षांचे उमेदवार रूपेश दराडे या दोन तुल्यबळ उमेदवारांनी आपला प्रचार अधिक गतिमान केला आहे. आपणच विजयी होऊ, असे दावे लोणारी व दराडे यांनी केले असले, तरी जनता जनार्दनाची साथ कोणाला मिळते, हा महत्त्वाचा
प्रश्न आहे.
येवला मतदारसंघाचे आमदार, मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून शहराचा विकास झाला तर शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर दराडे, माजी आमदार नरेंद्र दराडे यांच्या माध्यमातून शहराचा विकास झाला आहे, ही वस्तुस्थिती आहे. भुजबळ व दराडे यांना मानणारा मोठा वर्ग येवल्यात आहे. मात्र, नगराध्यक्षपदाची लढाई अटीतटीची असल्याने कोणत्या उमेदवाराच्या पारड्यात जनता भरभरून मतदान टाकते, हे समजेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *