बिल थकल्याने महावितरणकडून वीजपुरवठा खंडित
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
शहरात शनिवारी (दि. 22) नगरपरिषदेचा पाणीपुरवठा बंद राहिला. अंबोली धरणावर वीजपुरवठा खंडित झाल्याने शनिवारी नियमित वेळेत पाणीपुरवठा होणार नाही, तसेच वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाल्यानंतर उशिरा पाणीपुरवठा करण्यात येईल, असा संदेश समाजमाध्यमांवर फिरवण्यात आला. मात्र, तो शुक्रवारी (दि. 21) रात्री उशिरा व्हायरल करण्यात आला. त्यामुळे नागरिक बेसावध राहिले. शनिवारी दिवसभर पाणीपुरवठा झाला नाही. शहरात असलेली गर्दी, देवमास म्हणून समजला जाणार मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे. त्यामुळे व्रतवैकल्य करताना खंडित पाणीपुरवठा गृहिणींना डोकेदुखी निर्माण करणारा ठरला.
याबाबत माहिती घेतली असता, नगरपरिषद प्रशासनाकडे महावितरणचे वीजबिल थकल्याचे समजले. ही बाकी साठ लाखांच्या घरात पोहोचली आहे. ती वसूल करण्यासाठी महावितरणच्या अधिकार्यांनी अंंबोली धरणावरचा पुरवठा खंडित केला. दरम्यान, याबाबत नगरपरिषद प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, थकबाकीतील काही रक्कम बँक खात्यावर वर्ग केली आहे. काही रक्कम सोमवारी भरणार आहोत. तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे अत्यावश्यक गरज असलेले पिण्याचे पाणी थांबेल अशा प्रकारची कारवाई करण्यात येऊ नये, अशी नगरपरिषदेतर्फे महावितरणच्या स्थानिक अधिकार्यांना विनंती केली. मात्र, त्यांनी काहीही न ऐकता वीजपुरवठा खंडित केला. त्र्यंबकेश्वर येथील 15 हजार नागरिक व देवदर्शन, पूजाविधीसाठी आलेले 25 हजार भाविक, अशा सुमारे 40 हजार नागरिकांना पाणीपुरवठा खंडित करून वेठीस धरण्यात आले आहे.
त्र्यंबक नगरपरिषदेला नियमित उत्पन्न देणारा वाहन प्रवेश फी हा प्रमुख स्रोेत होता. दर आठवड्याला सरासरी दोन ते अडीच लाख रुपये भरणा होत असायचा. त्यासोबत वाहन टोइंग आणि पार्किंगचा दर आठवड्याला 80 हजारांचा भरणा होत असायचा. दर सोमवारी अथवा मंगळवारी सरासरी तीन लाख रुपये भरणा येत असल्याने नियमित खर्च भागवणे शक्य होत असायचे. मात्र,
सद्यःस्थितीत शासनाच्या आदेशाने वाहन प्रवेश फी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे वीजबिलासह आणखी काही आवश्यक असलेले नियमित खर्च करणे नगरपरिषद प्रशासनाला शक्य होत नाही.
नगरपरिषद मेटाकुटीला
निवडणूक असल्याने काही प्रमाणात घरपट्टी वसूल झाली. मात्र, वीजबिल, पथदीप देखभाल-दुरुस्ती, पाणीपुरवठा मनुष्यबळ, साफसफाई यांसारख्या सुविधा ठेकेदारीने दिलेल्या आहेत. त्यांची देयके अदा करताना नगरपरिषद मेटाकुटीला येत आहे. नगरपरिषद फंडात खडखडाट आहे. नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक सुरू असताना महावितरणच्या थेट कारवाईने नागरिकांना पाण्यापासून वंचित राहण्याची आलेली वेळ सत्ताधारी पक्षाबाबत नाराजी निर्माण करणारी ठरली आहे.