विरोधकांची कसोटी; सुनेत्रा पवार यांचे पहिलेच अधिवेशन
मुंबई :
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनास आज, सोमवार (दि.23)पासून सुरवात होत आहे. विरोधी पक्षनेत्याविना होणार्या या अधिवेशनात सत्ताधार्यांपेक्षा विरोधकांचीच मोठी कसोटी लागणार आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर होत असलेले हे पहिलेच अधिवेशन असल्याने त्यांची उणीव प्रकर्षाने भासणार आहे.
पहिल्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणानंतर दिवंगत अजित पवार यांना शोकप्रस्तावाद्वारे श्रद्धांंजली अर्पण केली जाईल. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा परिचय सभागृहाला करून देतील.
झिरवाळ यांना क्लीन चिट
अन्न आणि औषध प्रशासन खात्यातील लाचखोरी प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंनी मंत्री नरहरी झिरवाळ यांना क्लीन चिट दिली आहे. लाचखोरी प्रकरणात मंत्र्यांच्या विरोधात कोणताही पुरावा नाही. पुरावे असल्यास एसीबी कारवाई करते, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. ते म्हणाले की, मी अँटी करप्शन ब्युरोला पूर्णपणे स्वातंत्र्य दिले आहे. उद्या माझ्याही कार्यालयात असा कोणी व्यवहार केला तर त्याच्यावरदेखील कारवाई होईल. मंत्र्याच्या विरोधात पुरावा असता तर कारवाई झाली असती. कोणतीही कारवाई करण्याआधी एसीबी आधी माहिती घेते. त्यावेळचं संभाषणदेखील रेकॉर्ड केलं जातं, त्याच्या नोंदी घेतल्या जातात. आतापर्यंत समोर आलेल्या गोष्टींमधून मंत्र्यांचं कुठेही नाव आलेलं नाही.
अर्थसंकल्प 6 मार्चला सादर होणार
राज्याचा सन 2026-27 या वर्षाचा अर्थसंकल्प 6 मार्च रोजी दुपारी 2 वाजता सादर होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत, तर वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल विधान परिषदेत अर्थसंकल्प मांडतील. मुख्यमंत्र्यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी फडणवीस यांनी वित्तमंत्री या नात्याने सन 2023-24 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला होता.