त्र्यंबकेश्वर शहरात लोकार्पणापूर्वी तोडफोड, घाणीचे साम्राज्य
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
शहराला प्राचीन तलावांचा वैभवशाली वारसा लाभला आहे. या तलावांचे सुशोभीकरण करण्याच्या नावाने वारंवार कोट्यवधींचा खर्च शासनाच्या विविध विभागांमार्फत केला जातो. त्र्यंबकेश्वर शहराच्या मध्यवर्ती भागात कुशावर्त तीर्थाजवळ असलेल्या इंदाळेश्वर तलावाचे सुशोभीकरणाचे काम राज्य पुरातत्त्व विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी तलावाच्या भिंतीवर प्रसाद योजनेतून टाकलेले ग्रॅनाइट काढण्यात येत आहे.
इंद्राळेश्वर तलाव हा पूर्वापार अस्वच्छतेच्या विळख्यात सापडलेला आहे. शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या घरांची मागची बाजू येते व त्यामुळे या परिसरात केरकचरा, घाण टाकली जाते. इंद्रतीर्थ तलावाची बांधणी सन 1778 मध्ये विष्णू महादेव गद्रे यांनी त्यावेळी 22 हजार रुपये खर्चून केली आहे. दगडी बांधकामातील या तलावाचे बांधकाम आखीवरेखीव असे आहे. बाजूस असलेले कुंड सूर्यरथाची संकल्पना सुंदर अशी आहे. सतत पाणवेलींनी व्यापलेल्या या तलावाच्या बाजूला कचराकुंड्यांचा विळखा पडल्याने या सुंदर शिल्पकलेचा नमुना असलेला तलाव वर्षानुवर्ष दुर्लक्षित आहे.
या तलावाच्या सुशोभीकरणाच्या नावाने आतापर्यंत झालेला खर्च डोळे फिरतील असा आहे. सिंहस्थ 2003 मध्ये या तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले. संरक्षक भिंतीवर लोखंडी रेलिंग करण्यात आले आणि तलावातील पाणवेली काढून त्यात विद्युत रोषणाईसह कारंजा उभारण्यात आला. यासाठी तेव्हा दहा लाखांचा खर्च केला. अल्पावधीत कारंजा अदृश्य झाला. त्यानंतर सिंहस्थ 2015 मध्ये रेलिंग बदलण्यात आले व किरकोळ डागडुजी करत 25 लाख रुपये खर्च केले. त्यानंतर केंद्र शासनाच्या प्रसाद योजनेत या तलावाचे सुशोभीकरण हाती घेण्यात आले. त्यासाठी एक कोटी 77 लाखांची तरतूद केली. सन 2019 मध्ये प्रारंभ झाला. मात्र, प्रत्यक्ष 2022 मध्ये काम सुरू करण्यात आले. ते अगदी अलीकडे 2024 पर्यंत सुरू होते. घाटाच्या भिंतीवर ग्रॅनाइट टाकण्यात आले व रेलिंग बदलण्यात आले. विशेष म्हणजे, या सुशोभीकरणात तलावाच्या भिंतीवर उगवलेली झाडेझुडपेही काढली नाहीत. आता पुन्हा या तलावाचे सुशोभीकरण सुरू झाले आहे. शासनाच्या या उधळपट्टीकडे नागरिक आश्चर्याने बघत आहेत.
Frequent beautification of lakes at the cost of crores?