नियमित तपासण्या, योग्य उपचारातून कर्करोगाला ठेवा दूर

नारायणी हॉस्पिटलतर्फे ’आरोग्यावर बोलू काही’ उपक्रम

नाशिक : प्रतिनिधी
कर्करोग म्हणजे नक्की काय, इथंपासून तर पुरुष व महिलांमध्ये आढळणारे कर्करोग व त्यांची लक्षणे, कर्करोगावर उपलब्ध आधुनिक उपचार याविषयी मार्गदर्शन करताना लक्षणांकडे दुर्लक्ष करायला नको. नियमित तपासण्या, योग्य उपचारातून कर्करोगाला दूर ठेवण्याचा सल्ला नारायणी हॉस्पिटलचे कर्करोग तज्ज्ञ डॉ. अजय जाधव, डॉ.चंद्रशेखर पेठे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मयुरी केळकर, बालरोग व किशोरवयीनतज्ज्ञ डॉ. दीपा जोशी यांनी दिला.
नारायणी हॉस्पिटलतर्फे रविवारी दीपालीनगर येथील शर्मा मंगल कार्यालय येथे आयोजित ‘आरोग्यावर बोलू काही’ उपक्रमांतर्गत आयोजित सत्रामध्ये या तज्ज्ञांनी संवाद साधला.
उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.
डॉ. अजय जाधव म्हणाले, कर्करोग हा काही शरीराबाहेरून आलेला आजार नाही. जेव्हा आपल्या शरीरातीलच पेशी अनियंत्रितपणे वाढता तेव्हा कर्करोगाला सुरुवात होते. पुरुष आणि महिला दोन्हींमध्ये वेगवेगळ्या पद्धतींचे कर्करोगाचे रुग्ण आढळतात. पुरुषांमध्ये मुखाचा कर्करोग अधिक प्रमाणात बघायला मिळत असून, महिलावर्गात स्तनांचा व गर्भाशय पिशवीच्या तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. शक्य तितक्या लवकर निदान होऊन उपचार प्रक्रियेत येणे गरजेचे ठरते. नारायणी हॉस्पिटलमध्ये आजवर अनेक कर्करोगग्रस्त रुग्णांवर यशस्वी उपचार केल्याचे सांगत योग्य मार्गदर्शन घेत रुग्णांनी कर्करोगाचा अटकाव करण्याचा सल्ला दिला.
सामान्यतः चाळिशीनंतर कर्करोग आढळतो. वय वाढण्यासोबत कर्करोगाची जोखीम वाढली आहे. उपचार घेऊनही शरीरावरील कुठलीही गाठ कमी होत नसली तर दुर्लक्ष न करता तपासण्या केल्या पाहिजे.
डॉ. मयुरी केळकर म्हणाल्या, की महिलांमध्ये सामान्यतः 27 ते 28 टक्क्यांपर्यंत स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण पोहोचले आहे तर त्या खालोखाल गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आढळतो. मात्र, 50 टक्के कर्करोग लवकर निदान झाल्यास टाळता येऊ शकतात. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगातील लक्षणांमध्ये प्रामुख्याने दोन पाळ्यांमध्ये रक्तस्त्राव, शारीरिक संबंधानंतर रक्तस्त्राव किंवा योनीमार्गातून दुर्गंधीयुक्त स्त्राव तसेच पाळीच्या इतर समस्यांकडे दुर्लक्ष करायला नको. रजोनिवृत्तीनंतरही रक्तस्त्राव होणे हेदेखील जोखमीचे लक्षण आहे. पॅप्समिअर चाचणी व सोनोग्राफी अशा सोप्या चाचण्या महिलांनी वर्षातून – दोन वर्षातून किमान एकदा करून घेणे
गरजेचे ठरते.
डॉ. दीपा जोशी म्हणाल्या, किशोरवयीन मुलींमध्ये अंडाशयाचा, थायरॉइडचा कर्करोग सर्वाधिक प्रमाणात आढळतो. संतुलित आहार, व्यायाम, मासिक पाळीदरम्यान जंतुसंसर्ग टाळण्यासाठी योग्य ती स्वच्छतेची काळजी घेणे आणि लसीकरण हे सर्व भविष्यातील कर्करोग टाळण्यासाठी किशोरवयीन मुलींसाठी केले पाहिजे. 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी लस उपलब्ध आहे. ही लस 45 वर्षांपर्यंत महिलांना देता येते. ही लस जरूर द्यावी, असे डॉ. दीपा जोशी म्हणाल्या.
डॉ. चंद्रशेखर पेठे यांनी उपचारातील टप्पे समजावून सांगितले. ते म्हणाले, कुठल्याही कर्करोगावर उपचार करायचे दोन टप्पे असतात. निदान झाल्यानंतर कर्करोग बरा करणे व हा आजार पुन्हा उद्भवू नये याची काळजी घेणे गरजेचे असते. उपचारातील तंत्र सुधारत गेले असून, अगदी गुंतागुंतीच्या स्थितीतील कर्करोगावर उपचार करणे शक्य झाले आहे. स्तनांच्या कर्करोगात अनेक प्रकार आहेत. ते लक्षात आल्यानंतर त्यानुसार प्रत्येक रुग्णावर त्यांच्या वैद्यकीय स्थितीनुसार उपचार केले जातात. समाजात या आजाराविषयीचे काही गैरसमज दूर होण्याची आवश्यकता आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. पंकज राणे, डॉ. मनीष चोकसी, डॉ. देवीकुमार केळकर, डॉ. स्वप्नील साखला, डॉ. दिनेश जोशी, डॉ. आनंद दिवाण, डॉ. अजय जाधव यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात केली.

Keep cancer away through regular checkups and proper treatment.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *