सिन्नर न.प.च्या तिजोरीत 16.44 कोटींची विक्रमी भर

अभय योजनेचा सिन्नरकरांना दिलासा; विकासकामांना मिळणार गती; 7 कोटी 58 लाखांचा दंड माफ

सिन्नर : भरत घोटेकर
सिन्नर नगर परिषदेच्या अभय योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने नगर परिषदेच्या तिजोरीत मोठी भर पडली आहे. घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या थकबाकीवर 100 टक्के दंडमाफी मिळाल्यामुळे हजारो मालमत्ताधारकांनी थकीत कर भरला. यामुळे नगर परिषदेच्या गंगाजळीत 16 कोटी 44 लाख 70 हजार 487 रुपये जमा झाले आहेत. विशेष म्हणजे, शेवटच्या 7 दिवसांत घरपट्टी व पाणीपट्टी मिळून तब्बल दहा कोटी 60 लाख रुपयांचा विक्रमी वसूल झाला.

मागील वर्षी घरपट्टीतून 6 कोटी 51 लाख रुपये इतका महसूल मिळाला होता. मात्र यंदा अभय योजनेमुळे हा आकडा मोठ्या प्रमाणात वाढून 16 कोटी 44 लाखांपर्यंत पोहोचला आहे. याशिवाय पाणीपट्टीतूनही चांगली वसुली झाली असून 2 कोटी 54 लाख 89 हजार 262 रुपये महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षी हा आकडा 1 कोटी 91 लाख 89 हजार 621 रुपये इतका होता.
नगरविकास विभागाने 24 मार्च रोजी 100 टक्के शास्ती माफीचा अध्यादेश काढल्यानंतर दुसर्‍याच दिवशीपासून नगरपरिषद प्रशासनाने प्रत्यक्ष कामकाज सुरू केले. नागरिकांना संधी मिळावी म्हणून सात दिवस कार्यालयीन वेळेनंतरही तसेच सुटीच्या दिवशीही वसुलीचे काम सुरू ठेवण्यात आले. विशेष म्हणजे 31 मार्चच्या रात्री 12 वाजेपर्यंत मालमत्ता कर भरण्याचे काम सुरू होते.
या कालावधीत 4620 थकीत मालमत्ता धारकांनी अभय योजनेचा लाभ घेतला. यामुळे नागरिकांना 7 कोटी 58 लाख 87 हजार 230 रुपयांच्या दंडातून माफी मिळाली. दरम्यान, शास्ती माफीचा लाभ घेण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून पाणीपट्टी भरणे आवश्यक करण्यात आले होते. परिणामी, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 63 लाखांची अधिकचा पाणीपट्टी वसुल झाला.
नगरपरिषदेच्या तिजोरीत झालेल्या या वाढीमुळे आगामी काळात शहरातील पाणीपुरवठा, गटार, रस्ते व इतर विकासकामांना गती मिळणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

डिजिटल भरणा करण्यास प्राधान्य

सिन्नर नगर परिषदेने डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन दिले आहे. नागरिकांनी क्यूआर कोड स्कॅन करून वर्षभरात तब्बल एक कोटी 32 लाख रुपयांचा कर भरला, अशी माहिती प्रशासनाने दिली. तसेच चेक व ऑनलाइन पेमेंट सिस्टिममध्ये प्रलंबित असल्याने ते क्लिअर झाल्यानंतर वसुलीच्या आकड्यात आणखी वाढ होईल. त्यामुळेही कर वसुलीत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अशी झाली घरपट्टी वसूल

प6,51,00,000/- (2025-26)
प16,44,70,487/- (2026-27)
पशास्ती माफीचा लाभ घेतलेले मालमत्ता धारक- 4,620
प100 टक्के दंड माफीची रक्कम- 7,58,87,230/-
* पाणीपट्टी *
प1,91,89,621/- (2025-26)
प2,54,89,262/- (2026-27)

अधिकारी, पदाधिकार्‍यांच्या प्रयत्नांना यश

सिन्नरकरांना 100 टक्के शास्तीमाफी मिळावी यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केल्याने त्यास यश आले. 24 मार्च 2026 रोजी शासनाने त्याचा अध्यादेश काढला. नगराध्यक्ष विठ्ठल उगले, उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख, गटनेते सागर भाटजिरे, मनोज देशमुख, नगरसेवक अ‍ॅड. पंकज जाधव, दत्ता हांडे, यांच्यासह इतर नगरसेवकांनी यासाठी आमदार कोकाटे यांच्याकडे शास्ती माफीसाठी केलेल्या मुंबई वार्‍या सत्कारणी लागल्या. प्रशासन स्तरावर अभय योजनेसाठी मुख्याधिकारी अभिजीत कदम, कर अधिकारी योगेश मुळे, करनिरीक्षक अमित काकुळते यांनी परिश्रम घेतले.

Record addition of Rs 16.44 crores in Sinnar NP treasury

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *