भेंडवळच्या घटमांडणीचे भाकीत; 350 वर्षांची प्रदीर्घ परंपरा
बुलडाणा : प्रतिनिधी
बुलढाणा जिल्ह्यातील 350 वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेल्या भेंडवळच्या घटमांडणीचे आगामी मान्सून 2026 आणि वर्षभराचे भविष्य जाहीर करण्यात आले आहे. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर
झालेल्या या मांडणीतून पाऊस, पिके, देशाची राजकीय आणि आर्थिक स्थिती यावर महत्त्वपूर्ण भाकिते वर्तवण्यात आली आहेत. त्यानुसार यंदाचा मान्सून संमिश्र राहणार आहे. अतिवृष्टीपासून सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पावसाचा अंदाज पाहता, कुठे ओढ देणारा, तर कुठे अतिवृष्टी असे यंदा पावसाचे चित्र संमिश्र राहण्याचा अंदाज आहे. जून महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले राहील, मात्र काही भागात पेरण्यांना सुरुवातीला पावसाची ओढ जाणवू शकते. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर अधिक असेल. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे नद्यांना महापूर येण्याची आणि पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शेतकर्यांसाठी यंदाचे वर्ष ’कधी आनंद, तर कधी चिंता’ असे ठरेल.कापूस, तांदूळ, तीळ आणि बाजरी या पिकांचे उत्पादन चांगले होईल. ज्वारी, तूर, मूग, उडीद आणि मटकी ही पिके साधारण राहतील. पिकांवर मोठ्या प्रमाणावर रोगराईचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे शेतकर्यांच्या खर्चात वाढ होऊ शकते.
राजकीय आणि संरक्षण स्थिती
मांडणीतील ’पानविडा’ (राजाचे प्रतीक) स्थिर आहे. याचा अर्थ देशातील सर्वोच्च नेतृत्व किंवा सत्ता स्थिर राहील, मात्र राजावर मानसिक आणि कामाचा मोठा तणाव असेल. ’करडी’चे दाणे विखुरलेले आढळल्याने देशाच्या सीमा सुरक्षेवर मोठा ताण राहू शकतो. शत्रू राष्ट्रांकडून कुरघोड्या होण्याची शक्यता आहे.
अर्थव्यवस्था आणि नैसर्गिक आपत्ती
’करंजी’ फुटलेली आढळल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण राहील आणि महागाई वाढण्याचे संकेत आहेत. यंदा घटावरील ’पुरी’ (पृथ्वीचे प्रतीक) गायब झाल्याचे दिसून आले. हे चिन्ह भविष्यात येणार्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीचे किंवा पृथ्वीवरील मोठ्या संकटाचे सूचक मानले जाते.
भेंडवळची परंपरा काय आहे?
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथे गेल्या 350 वर्षांपासून चंद्रभान महाराज वाघ यांनी सुरू केलेली ही परंपरा त्यांचे वंशज आजही जोपासत आहेत. अक्षय्य तृतीयेच्या संध्याकाळी शेतात घट मांडला जातो, ज्यामध्ये 18 प्रकारची धान्ये, मातीची ढेकळे, पुरी, करंजी, सांजोरी आणि पाण्याचा घट ठेवला जातो. दुसर्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी या वस्तूंच्या स्थितीत झालेल्या बदलावरून वर्षभराचे भाकीत वर्तवले जाते. भेंडवळची भविष्यवाणी हा अनेक वर्षांपासून चालत आलेला श्रद्धेचा आणि निरीक्षणाचा भाग आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या वैज्ञानिक अंदाजांशी याची तुलना करणे आवश्यक आहे. बळीराजासाठी ही भविष्यवाणी नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. यंदाचा मान्सून संमिश्र असला तरी अतिवृष्टीपासून सावध राहण्याचा इशारा यातून देण्यात आला आहे.
This year’s monsoon is mixed, warning to be careful of heavy rains