सुनेत्रा पवार यांची मागणी

अजित पवार यांच्या निधनाने बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. अजित पवार यांच्या पत्नी, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार या निवडणुकीत उमेदवार आहेत. महायुतीतील भाजपा, शिवसेना या प्रमुख पक्षांंसह लहान पक्षांचाही त्यांना पाठिंबा आहे. याशिवाय राज्यात विरोधी बाकावर बसलेल्या महाविकास आघाडीतील एकाही पक्षाने उमेदवार दिलेला नाही. महाविकास आघाडीनेही सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिलेला आहे. इतर पक्षही निवडणुकीपासून दूर आहेत. काहींनी अपक्ष म्ह़णून अर्ज भरल्याने पोटनिवडणुकीसाठी मतदान अपरिहार्य आहे. कोणीही अपक्ष उमेदवार नसते, तर सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड झाली असती. बिनविरोध निवडीचे प्रयत्न झालेही; परंतु केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी काही अपक्ष उमेदवार आहेत. सुरुवातीला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. त्यांनी नंतर माघार घेतली. काँग्रेसनेही उमेदवार देण्याचे संकेत दिले होते. नंतर काँग्रेसनेही माघार घेतली. महाविकास आघाडीतील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक न लढविण्याचा निर्णय आधीच घेऊन सुनेत्रा पवार यांचा मार्ग मोकळा केला होता. सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या शिवसेनेचा पाठिंबा मिळविला. त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशीही संपर्क साधला होता. उमेदवार न देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार प्रदेश काँग्रेसने मागे घेतला. एकूण परिस्थिती पाहता सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित आहे. त्यांना प्रचार करण्याची अजिबात गरज नव्हती; परंतु विक्रमी मतांनी त्यांना विजयी करण्याचे त्यांच्या पक्षाचे आणि महायुतीचे प्रयत्न आहेत. बारामतीच्या मतदारांना पवार परिवाराची चांगली माहिती आहे. सुनेत्रा पवार यांना मत द्या, असे आवाहन मतदारांना करण्याची आवश्यकताही नाही. मात्र, बारामतीकरांशी अनौपचारिकपणे पारिवारिक संवाद साधण्यासाठी सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा मंगळवारी बारामतीत घेण्यात आली. या सभेत त्यांनी उपस्थितांना भावनिक साद घातली. अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना त्या भावुक झाल्या. त्यांनी अजित पवार यांच्या निधनाची सखोल चौकशी करण्याची मागणी प्रथमच केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. अजित पवार यांच्या निधनाबद्दल शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार सुरुवातीपासून संशय व्यक्त करत आले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही तसाच संशय व्यक्त केलेला आहे. विमान अपघाताबद्दल एफआयआर दाखल करण्याची मागणी रोहित पवार सातत्याने करीत आले आहेत. पण एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. राज्यात महायुतीचे सरकार असून, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे गृहविभाग असताना विमान अपघाताबद्दल एफआयआर दाखल का केला जात नाही? हा प्रश्न रोहित पवार यांनी सातत्याने उपस्थित केलेला आहे. राज्यात एसआयआर दाखल होत नाही म्हणून रोहित पवार यांनी शेजारच्या कर्नाटक राज्यात जाऊन एफआयआर दाखल केला. कर्नाटकात काँग्रेसची सत्ता असल्यानेच एसआयआर दाखल करण्यात आला. पण महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश असूनही महाराष्ट्रात एफआयआर दाखल होत नाही, हा एक मोठा विरोधाभास आहे. त्यांनी प्रचाराच्या सांगता सभेत भावुक होत अजित पवार यांच्या निधनाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. प्रचाराच्या सांगता सभेत सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या निधनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत सखोल चौकशीची मागणी केली. अपघाताबाबत जशा तुमच्या मनात शंका आहेत, तशाच माझ्याही मनात आहेत. त्या दूर व्हायलाच हव्यात, असे त्या भावुक होऊन म्हणाल्या. त्यांनी प्रथमच अजित पवार यांच्या निधनाबद्दल शंका उपस्थित केली. याआधी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून अपघाताच्या चौकशीबाबत आणि विमान कंपनीच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. विमान कंपनीचा निष्काळजीपणा आणि तपास यंत्रणांच्या अहवालातील त्रुटींवर सोशल मीडियाद्वारे शंका उपस्थित केली होती. यानंतर सुनेत्रा पवार यांनी प्रथमच शंका उपस्थित केल्याने चौकशी होणे आवश्यक आहे. याप्रकरणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन सुनेत्रा पवार यांनी चर्चा केलेली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने सखोल तपासाचे स्पष्ट निर्देश दिले असून, सत्य समोर यायलाच हवे आणि दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. अजित पवारांविषयी बोलताना सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी त्यांच्या स्मृती जपण्यासाठी बारामतीत भव्य स्मारक आणि संग्रहालय उभारण्याची घोषणाही केली. दादांच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास यात मांडला जाईल, असं त्या म्हणाल्या. अजित पवार यांची उणीव बारामतीकरांना निश्चित जाणवत आहे. मात्र, त्यांच्या निधनाची चौकशी व्हावी, असे सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत म्हटले आहे. चौकशीची जबाबदारी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारांवर टाकली आहे. अजित पवार यांच्या निधनाबद्दल त्यांनी जाहीररीत्या कोणतीही मागणी केली नव्हती. आता त्यांनी स्पष्टपणे सखोल चौकशीची मागणी केल्याने आमदार रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांनी आधी उपस्थित केलेल्या शंकांना पुष्टी मिळाली आहे. पोटनिवडणूक प्रचाराच्या सांगता सभेत सुनेत्रा पवार अशा प्रकारची मागणी करतील, असे कोणालाही वाटले नसेल. थोड्या दमाने का होईना त्यांनी शंका उपस्थित केली आणि सखोल चौकशीची मागणी केली. त्यांच्या मागणीला आता महत्त्व प्राप्त झाले आहे.

Sunetra Pawar’s demand

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *