पश्चिम बंगालमध्ये मतदानाचा विक्रम

तमिळनाडूमध्ये सर्वाधिक
84 टक्के मतदानाची नोंद

पश्चिम बंगाल
89.93 टक्के

नवी दिल्ली/कोलकाता
पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विक्रमी मतदानाची नोंद झाली. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 152 मतदारसंघांमध्ये 89.93 टक्के मतदान झाले होते. दरम्यान, तामिळनाडूमध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत 234 मतदारसंघांमध्ये 84 टक्के मतदानासह इतिहासातील सर्वाधिक मतदानाची नोंद झाली. दोन्ही राज्यांमध्ये सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. बंगाल निवडणुका जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, राज्यातील जनतेने ‘एसआयआर’च्या विरोधात प्रचंड मतदान केले आहे.
देशातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या 2026 च्या पहिल्या टप्प्यातील मतदान गुरुवारी पार पडले. यासोबतच तामिळनाडू आणि इतर काही राज्यांमध्येही मतदानाची प्रक्रिया पार पडली. पश्चिम बंगालमध्ये सकाळपासूनच मतदारांचा उत्साह दिसून आला असला तरी, अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटनांनी या प्रक्रियेला गालबोट लावले आहे.
पश्चिम बंगालमधील दक्षिण मिदनापूर येथील कुमारगंज मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुवेंदू सरकार यांच्यावर हल्ला झाला. एका व्हिडिओमध्ये सुवेंदू हल्ल्यातून वाचण्यासाठी पळताना दिसले. दरम्यान, बर्नपूरच्या रहमतनगर परिसरात आसनसोल दक्षिण मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या गाडीवरही हल्ला झाला, ज्यात मागची काच फोडण्यात आली. अग्निमित्रा यांनी सांगितले की, मतदान केंद्रातून बाहेर पडत असताना त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाडझाल्याच्या तक्रारीही आल्या आहेत. बीरभूमच्या बोधपूर गावात ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यानंतर लोकांनी पोलीस आणि केंद्रीय दलांवर दगडफेक केली. पोलिसांच्या वाहनांचीही तोडफोड करण्यात आली. या घटनेत अनेक सुरक्षा कर्मचारी जखमी झाले.
मुर्शिदाबादमध्ये कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले, ज्यामुळे सुरक्षा दलांना लाठीमार करावा लागला. तमिळनाडूतील पुमपुहार मतदारसंघात एका मतदान केंद्रावर ड्युटीवर असलेल्या पोलिसावर चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी एका माजी सैनिकाला अटक करण्यात आली आहे. तामिळनाडूच्या काही दक्षिण जिल्ह्यांमध्ये मतदारांना गुपचूप पैसे वाटले जात असल्याच्या तक्रारींवरून निवडणूक आयोगाने भरारी पथके तैनात केली होती.
400 हून अधिक तक्रारी
पहिल्या टप्प्यात मतदानाच्या दरम्यान विविध राजकीय पक्षांकडून निवडणूक आयोगाकडे 400 हून अधिक अधिकृत तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने ईव्हीएममधील तांत्रिक बिघाड, मतदान केंद्रांवर एजंटना मज्जाव करणे आणि मतदारांना धमकावणे यासारख्या गंभीर आरोपांचा समावेश आहे.
राष्ट्रीय स्तरावरील स्थिती
पश्चिम बंगालव्यतिरिक्त दक्षिण भारतात तामिळनाडूमध्ये देखील मतदानाची प्रक्रिया उत्साहात पार पडली. तिथे सायंकाळपर्यंत सुमारे 82.24% मतदान झाले आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालमधील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी अतिरिक्त केंद्रीय दलांच्या कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.

सेलिब्रेटींचे मतदान

चेन्नईमध्ये रजनीकांत, विजय आणि अजित कुमार यांसारख्या दिग्गज कलाकारांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. अभिनेता विजयने मतदानानंतर पालकांना आपल्या मुलांच्या सांगण्यावरून मतदान करण्याचे आवाहन केल्याने त्याची चर्चा रंगली.

दोन्ही राज्यांत ईव्हीएम बिघाड

दोन्ही राज्यांत ईव्हीएम मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मतदानाची प्रक्रिया उशिराने सुरू झाली. बंगालमध्ये पहिल्या टप्प्यासाठी केंद्रीय दलांच्या तुकड्या तैनात होत्या, तरीही अंतर्गत भागात हिंसाचाराच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्या आहेत.

Record turnout in West Bengal

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *