करूया हवामान अनुकूल शेती

– सोनाली कदम
गेल्या काही वर्षांपासून हवामानाचा अंदाज बांधणे कठीण होत चालले आहे. कधी पाऊस वेळेवर येत नाही, कधी एकदम मुसळधार पडतो, तर कधी दीर्घकाळ खंड पडतो. यावर्षीही एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण आणि वितरण अनियमित राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांनी पूर्वतयारी करून हवामान अनुकूल शेती पद्धतींचा अवलंब करणे गरजेचे आहे.
आज शेतीसमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे बदलते हवामान. वाढते तापमान, अनियमित पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळसदृश परिस्थिती, किडी-रोगांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे उत्पादनावर परिणाम होत आहे. त्यामुळे केवळ जास्त उत्पादन घेण्याचा विचार न करता उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करून उत्पादन टिकवून ठेवणे महत्त्वाचे झाले आहे.
पावसाचा थेंब जिरवूया
पाऊस कमी असो किंवा जास्त, त्याचे पाणी शेताबाहेर वाहून जाण्याऐवजी शेतातच जिरले पाहिजे. त्यासाठी उताराला आडवी मशागत, शेतबंधिस्ती, जैविक बांध, जलसंधारण सर्‍या आणि शेततळे यांसारख्या उपाययोजना करणे फायदेशीर ठरते. यामुळे जमिनीत ओलावा जास्त काळ टिकतो आणि पावसाचा खंड पडला तरी पिकांना आधार मिळतो.
“पाणी अडवा, पाणी जिरवा“ ही संकल्पना आज हवामान बदलाच्या काळात अधिक महत्त्वाची
ठरली आहे.
रुंद वरंब्यावर लागवड फायदेशीर
अतिवृष्टीमुळे पिकांच्या मुळाजवळ पाणी साचते आणि नुकसान होते. तर कमी पावसात ओलावा टिकून राहत नाही. अशा वेळी रुंद वरंबा (बेड) पद्धतीने लागवड केल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा होतो आणि आवश्यक ओलावा देखील टिकून राहतो. त्यामुळे सोयाबीन, मका, कापूस, हरभरा यांसारख्या पिकांसाठी ही पद्धत उपयुक्त ठरते.
पाण्याचा काटकसरीने वापर
पाणी हे भविष्यातील सर्वात मौल्यवान संसाधन आहे. त्यामुळे ठिबक आणि तुषार सिंचनासारख्या सूक्ष्म सिंचन पद्धतींचा वापर वाढविणे आवश्यक आहे. यामुळे पाण्याची बचत होते, खतांचा कार्यक्षम वापर होतो आणि उत्पादनात वाढ होते.
जमिनीचे आरोग्य जपूया
अति मशागतीमुळे जमिनीचा पोत बिघडतो आणि सुपीकता कमी होते. त्यामुळे शक्य तिथे कमीत कमी मशागत किंवा शून्य मशागत तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. पिकांचे अवशेष शेतातच ठेवावेत. यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढतो, ओलावा टिकून राहतो आणि जमिनीची उत्पादनक्षमता सुधारते.
योग्य वाणाची निवड महत्त्वाची
बदलत्या हवामानात योग्य वाणाची निवड करणे ही यशस्वी शेतीची गुरुकिल्ली आहे. कमी कालावधीत तयार होणारे, दुष्काळ किंवा जास्त पावसाचा सामना करू शकणारे आणि रोग-कीड प्रतिकारक्षम वाण निवडल्यास जोखीम कमी होते. कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेल्या हवामान अनुकूल वाणांचा
वापर करावा.
पेरणीपूर्वी बियाण्याची चाचणी करा
अनेक वेळा शेतकरी स्वतःकडील बियाणे वापरतात. मात्र पेरणीपूर्वी त्याची उगवण क्षमता तपासणे आवश्यक आहे. यामुळे अपेक्षित रोपसंख्या मिळते आणि दुबार पेरणीचा खर्च टाळता येतो.
बीजप्रक्रिया विसरू नका
बियाण्याला बुरशीनाशक, कीटकनाशक आणि जैविक खतांची प्रक्रिया केल्यास सुरुवातीच्या अवस्थेतील रोग व किडींपासून संरक्षण मिळते. कमी खर्चात पिकांची चांगली सुरुवात करण्यासाठी बीजप्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे.
आंतरपीक अवलंब करा
एकाच पिकावर अवलंबून राहण्याऐवजी सोयाबीन-तूर, कापूस-तूर, बाजरी-तूर अशा आंतरपीक पद्धतींचा अवलंब केल्यास जोखीम कमी होते. एखाद्या पिकाचे नुकसान झाले तरी दुसर्‍या पिकातून उत्पन्न मिळण्याची शक्यता राहते. महाविस्तार एआय अ‍ॅपमधून कृषी हवामान सल्ल्याचा लाभ घ्या. मोबाइलद्वारे हवामानाचा अंदाज आणि कृषी सल्ला सहज उपलब्ध होत आहे. पाऊस, तापमान आणि आर्द्रतेचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे केल्यास नुकसान टाळता येते. त्यामुळे कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र आणि हवामान आधारित कृषी सल्ला सेवांचा नियमित लाभ घ्या. एल निनोमुळे यंदाचा खरीप हंगाम काहीसा आव्हानात्मक ठरू शकतो. मात्र योग्य नियोजन, जलसंधारण, हवामान अनुकूल वाण, बीजप्रक्रिया, सूक्ष्म सिंचन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास या आव्हानांवर सहज मात करता येईल. बदलत्या हवामानाला दोष देण्यापेक्षा त्यानुसार शेतीत आवश्यक बदल करणे अधिक गरजेचे आहे. हवामान अनुकूल शेती हीच आजच्या काळातील शाश्वत आणि फायदेशीर शेतीची वाट आहे.

Let’s do climate-friendly farming

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *