नवी दिल्ली : प्रतिनिधी
देशातील शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक वृत्त आहे. बहुप्रतीक्षित नैर्ऋत्य मान्सून अखेर गुरुवारी (दि. 4 जून) केरळममध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) ने मान्सूनच्या अधिकृत आगमनाची घोषणा केली आहे. सर्वसाधारणपणे मान्सून 1 जून रोजी केरळच्या किनारपट्टीवर धडकतो. मात्र, यंदा तो चार दिवसांच्या विलंबाने दाखल झाला आहे. या विलंबाची शक्यता हवामान विभागाने आधीच वर्तवली होती. मान्सूनच्या आगमनामुळे देशातील मान्सून हंगामाची (जून ते सप्टेंबर) अधिकृत सुरुवात झाली आहे. देशभरात उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनाही आता मोठा दिलासा मिळणार आहे.
मान्सून केरळममध्ये दाखल होताच हवामान विभागाने त्याच्या पुढील वाटचालीचा अंदाजही जाहीर केला आहे. आयएमडीच्या माहितीनुसार, पुढील 6 ते 7 दिवस केरळममध्ये अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार (7 ते 20 सेंमी) पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबतच तामिळनाडू आणि कर्नाटकमध्येही जोरदार पाऊस अपेक्षित आहे. सध्या नैर्ऋत्य मान्सूनचा अरबी समुद्र, लक्षद्वीप बेटे आणि बंगालच्या उपसागराच्या उर्वरित भागांत पुढील प्रवास करण्यासाठी अतिशय अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. मान्सूनच्या या प्रगतीमुळे तेलंगणासह अनेक राज्यांमधील उष्णतेच्या लाटेचा (हीटवेव्ह) इशारा हवामान विभागाने मागे घेतला आहे. तापमानात लक्षणीय घट होण्यास सुरुवात
झाली आहे.
कृषी क्षेत्रासाठी संजीवनी
मान्सूनचे आगमन ही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि विशेषतः कृषी क्षेत्रासाठी संजीवनी मानली जाते. केरळममध्ये धडकल्यानंतर साधारणतः एका आठवड्यात मान्सून उत्तरेकडे सरकत तेलंगणा आणि इतर राज्यांत पोहोचण्याची शक्यता आहे. या चार दिवसांच्या विलंबामुळे खरीप हंगामातील पेरण्यांवर फारसा नकारात्मक परिणाम होणार नाही. कारण पुढील वाटचालीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मान्सूनच्या या प्रगतीमुळे आता महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसह देशातील इतर राज्यांमधील बळीराजालाही पेरणीच्या पूर्वमशागतीला गती देता येणार आहे. लवकरच पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळेल, अशी आशा पल्लवित झाली आहे.
Monsoon arrives in Kerala after four days delay