नवी दिल्ली/मुंबई : प्रतिनिधी
सध्या देशभरात मान्सूनचा जोर वाढत असून, 16 राज्यांत पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. महाराष्ट्रात रेड अलर्ट स्थिती कायम आहे. गुरुवारी महाराष्ट्रातही मान्सूनचा जोर वाढला असून, मुंबई, ठाणे, रायगडसाठी ऑरेंज तर पालघरला मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसाने महामुंबई क्षेत्रात अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने वाहतूक विस्कळीत होऊन रहदारीची कोंडी होत आहे. अनेक ठिकाणी वाहने पाण्यात अडकून पडल्याची स्थिती दिसत आहे.
उत्तर प्रदेश, बिहारमध्ये 5 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, उत्तराखंड, मध्य प्रदेशसह 16 राज्यांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उपग्रहाद्वारे घेतलेल्या ताज्या छायाचित्रांनुसार मुंबई-कोकण पट्टा आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागावर दाट ढगांचे आवरण असून, ते सक्रिय मान्सूनचे संकेत देत आहे. या संपूर्ण प्रदेशात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे.
शनिवार, 4 जुलै तसेच रविवार-सोमवार म्हणजे 5 आणि 6 जुलै रोजी उत्तर कोकण आणि दक्षिण गुजरातच्या वापी ते चिपळूण या पट्ट्यात अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. रविवारी, 5 जुलै रोजी उत्तर महाराष्ट्र तसेच मध्य आणि दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र, नांदेड, नाशिक पट्ट्यातही हवामान विभागाचा रेड अलर्ट जारी केला जाण्याची शक्यता सध्याच्या हवामान स्थितीवरून दिसत आहे.
मुंबईत मुसळधार
मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये गेल्या 24 तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, हवामान विभागाने (आयएमडी) मुंबई व ठाणे जिल्ह्यांसाठी ’ऑरेंज अलर्ट’ तर पालघर जिल्ह्यासाठी अत्यंत सतर्कतेचा ’रेड अलर्ट’ जारी केला आहे. विशेषतः मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये पावसाचा जोर अधिक राहिल्याने सखल भागांत जागोजागी पाणी साचल्याच्या तक्रारी आहेत. तसेच रेल्वे व लोकल उशिराने धावत होत्या.
Rains wreak havoc across the country.