ज्ञानोबा माउलीच्या गजरात अवघी दुमदुमली नाशिकनगरी…

– मुकुंद बाविस्कर

जाता पंढरीसी सुख वाटे जीवा।
आनंदे केशवा भेटताची॥
या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी।
पाहिली शोधुनी अवघी तीर्थे॥
असे भक्तिगीत आळवीत मोठ्या उत्साहाने ज्ञानोबा तुकारामचा गजर करत संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीबरोबर पायी दिंडीत निघालेले हजारो वारकरी त्र्यंबकेश्वर येथून मजल दरमजल करत नाशिक नगरीत दाखल झाले. पण शहरातील रस्त्यांच्या खोदकामामुळे व पावसामुळे सर्वत्र चिखल झाल्याने त्यांची सुखाची वाट जणू काही बिकट वाट झाली होती. महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा आणि वारकरी संप्रदायाच्या अखंड भक्तीचा साक्षीदार असलेला विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांचा पायी पालखी सोहळा बुधवारी (दि. 1 जुलै) नाशिकमध्ये अत्यंत भक्तिमय, पारंपरिक व आध्यात्मिक वातावरणात दाखल झाला. संत ज्ञानेश्वर महाराजांचे ज्येष्ठ बंधू आणि नाथ संप्रदायाचे आद्यगुरू संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी भाविक, वारकरी व नागरिकांनी गर्दी केली होती. पालखी शहरात प्रवेश करताच रिमझिम पावसाने हजेरी लावली. जणू वरुणराजानेही संतांच्या पालखीवर जलाभिषेक करून आपल्या भक्तीची सेवा अर्पण केली, अशी भावना उपस्थित वारकरी व्यक्त करीत होते. टाळ-मृदंगाचा निनाद, हरिनामाचा अखंड गजर, भगव्या पताका व तुळशीवृंदावनासह चालणार्‍या वारकर्‍यांमुळे संपूर्ण परिसर विठ्ठलनामात दंग झाला होता. मात्र, त्याच वेळी शहरातील रस्त्यांची कामे सुरू असल्याने ठिकठिकाणी असलेले मातीचे ढिगारे पावसामुळे चिखलमय बनल्याने वारकर्‍यांना मार्गक्रमण करताना मोठी अडचण निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी निसरड्या रस्त्यांमुळे ज्येष्ठ नागरिकांची चालताना चांगलीच धावपळ उडाली होती. वास्तविक त्र्यंबकेश्वरपासून येणार्‍या दिंडी व पालखी मार्गावरील रस्ते तरी वेळेआधीच पूर्ण झाले असते तर वारकर्‍यांवर ही वेळ आली नसती, अशी भावना अनेक जण व्यक्त करत होते. राजकीय नेते आणि पदाधिकारी यांचे याकडे दुर्लक्ष झालेले आढळले. त्याचवेळी रस्त्यांची कामे सुरू असल्याने वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी झालेली दिसली.
श्री कालिकादेवी मंदिर ट्रस्टतर्फे
शंभर वारकर्‍यांचा विशेष सन्मान
वारी ही केवळ पंढरपूरची यात्रा नसून महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा, सामाजिक समतेचा आणि अध्यात्माचा जिवंत वारसा आहे. संतांनी दिलेला मानवतेचा संदेश आजही वारीच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचत आहे. वारकर्‍यांच्या निःस्वार्थ सेवेला आणि त्यांच्या भक्तिभावाला समाजाने कृतज्ञतेने प्रतिसाद देणे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. अशा प्रकारचा कृतज्ञता सोहळा नाशिक शहरात पार पडला. आपल्या संतपरंपरेचा, भक्तीचा आणि समतेचा संदेश देणार्‍या आषाढी वारीला समाजाचे कृतज्ञ अभिवादन म्हणून नाशिकचे ग्रामदैवत श्री कालिकादेवी मंदिर ट्रस्टतर्फे त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पायी वारी करणार्‍या शंभर वारकर्‍यांचा विशेष सन्मान करण्यात आला. संत निवृत्तिनाथ महाराजांची पालखी नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर आयोजित या उपक्रमात वारकर्‍यांना अंथरूण-पांघरूण किटचे वाटप करण्यात आले. श्री कालिकादेवी मंदिराच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात सलग पाच वर्षे पायी वारी करणार्‍या पन्नास महिला वारकरी आणि सलग दहा वर्षे पायी वारी करणार्‍या पन्नास पुरुष वारकर्‍यांचा गौरव करण्यात आला. संत निवृत्तिनाथ महाराज पालखीचे मानकरी हभप मोहन महाराज बेलापूरकर यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. यावेळी हभप बाळकृष्ण महाराज डावरे, बाळासाहेब काकड महाराज, कालिकादेवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशव (अण्णा) पाटील, माजी नगरसेवक त्र्यंबक गायकवाड, दत्ता पाटील, अ‍ॅड. भाऊसाहेब गंभिरे, हभप पुंडलिक महाराज थेटे, विलास पांगरकर आदी उपस्थित होते. गौरवप्राप्त प्रत्येक वारकर्‍याला सतरंजी, चादर व डेंटल किटचा समावेश असलेले अंथरूण-पांघरूण किट देण्यात आले. या उपक्रमाचा आदर्श इतर सेवाभावी संस्थांनी घेण्याची गरज आहे.
श्री प्रीतिसुधाजी शिक्षण फंडातर्फे
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ
जैन श्वेेतांबर स्थानकवासी संघ संचलित पू. पू. श्री प्रीतिसुधाजी शिक्षण फंडाच्या वतीने धनदाई बँक्वेट हॉलमध्ये पहिली ते दहावीपर्यंतच्या अडीचशे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार समारंभ उत्साहात झाला. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय टाटिया, संघपती मंगलचंद साखला, गौतम प्रसादी, सहयोगी अजित बोरा व बक्षीस सहयोगी बिजलाल कटारिया, विशेष अतिथी सीए अक्षय राका, अनिता बुरड, प्रमुख अतिथी चांदमल कोठारी, कांतिलाल बागमार, राजेंद्र बिनायकीया, नेमिचंद तातेड, दिग्विजय चोपडा, अनिल बेदमुथा उपस्थित होते. जयेश तन्ना व शीतल तन्ना यांनी विशेष मार्गदर्शन केले.
त्यांच्या मार्गदर्शनाला पालक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी फंडाचे कार्याध्यक्ष जे. सी. भंडारी यांनी स्वागत करताना सांगितले की, श्री प्रीतिसुधाजी शिक्षण फंडाने गेल्या 48 वर्षांत जैन ओसवाल समाजातील हजारो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. हजारो गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला आहे. गेली अनेक वर्षे हा उपक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने राबविण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सहकार्य ठरणार आहे.
खा. डॉ. अमोल कोल्हे यांचे
महाराष्ट्र धर्म विषयावर व्याख्यान
एखाद्या राजकीय नेत्याच्या जयंतीनिमित्त अभ्यासू वक्त्याचे व्याख्यान घेण्याचा चांगला उपक्रम नाशिकमध्ये राबविला गेल्याचे दिसले. राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन नाशिक जिल्हाध्यक्ष दिवंगत अ‍ॅड. रवींद्र पगार यांच्या 65 व्या जयंतीनिमित्त सुविचार मंचतर्फे रावसाहेब थोरात सभागृहात ’महाराष्ट्र धर्म’ या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार तथा अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचे व्याख्यान झाले. त्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य केवळ लढाईपुरते मर्यादित नव्हते. त्यामागे उच्च नैतिक अधिष्ठान होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात मांडलेला ’एक व्यक्ती, एक मत आणि एक मूल्य’ हा विचार महाराष्ट्राच्या राज्यकारभारातही दिसतो. त्यामुळे आजच्या राजकारणाला नैतिकतेची जोड आवश्यक आहे. मात्र, ही नैतिकता हरवली तर समाज अधोगतीकडे जाईल, असे मत खा. डॉ. कोल्हे यांनी केले. ते पुढे म्हणाले, की सत्यवान-सावित्रीपासून ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्त्रीशिक्षणाच्या कार्याचा उल्लेख करत त्यांनी महाराष्ट्र धर्म हा विज्ञाननिष्ठ, समतेचा आणि माणुसकीचा विचार असल्याचे सांगितले.
लोककलावंतांचा एल्गार
आणि न्यायाची प्रतीक्षा
लोककला क्षेत्रातील उपेक्षित कलाकारांना न्याय मिळावा, सांस्कृतिक योजनांमधील कथित मक्तेदारी संपुष्टात यावी, तसेच ज्येष्ठ लोककलावंतांना सन्मान आणि मूलभूत सुविधा मिळाव्यात, या मागण्यांसाठी विविध सामाजिक संघटनांतर्फे नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी राज्य शासन आणि सांस्कृतिक संचालनालयाच्या विरोधात घोषणाबाजी करत लोककलावंतांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधले. संघटनेच्या नेत्या नंदा पुणेकर, अध्यक्ष विश्वास कांबळे, मीराबाई खरात, सत्यभामा खरात, जनाबाई डांगळे, सुनीता खरात आदींसह पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाला निवेदन दिले. या आंदोलनादरम्यान ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी नंदा पुणेकर यांना राष्ट्रपती पुरस्कारासाठी शिफारस करावी, त्यांना घरकुल, जीवनगौरव पुरस्कार व वाढीव मानधन द्यावे, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात कलाकार, संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. नाशिकमध्ये स्वतंत्र लोककला विद्यापीठ स्थापन करावे.लोककलावंतांची आधार कार्डच्या धर्तीवर शासकीय नोंदणी करावी. कलाकार मानधन योजनेतील गैरप्रकारांना आळा घालणे. गरजू कलाकारांना मोफत घरे उपलब्ध करून देणे. लोककलावंतांसाठी स्वतंत्र विमा व आरोग्य संरक्षण योजना सुरू करणे. लोककलावंतांची उपेक्षा होत असल्याने त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे नमूद करावेसे वाटते.

The entire city of Nashik resounded with the chants of “Dnyanoba Mauli”…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *