जिल्ह्यात मुसळधार, कसारा घाटात दरड कोसळली

पाऊस दृष्टिक्षेपात…
♦ पहिने येथे पुलाचा भराव गेला वाहून.
♦ सुरगाणा तालुक्यात संपर्क तुटला.
♦ गोदावरीला हंगामातील पहिला पूर.
♦ त्र्यंबकेश्वर, इगतपुरीत धुवाधार पाऊस.
♦ जिल्ह्यात 397 नागरिकांचे स्थलांतर.
मुंबई/नाशिक : प्रतिनिधी
वेगवान वार्यांची दिशा बदलल्याने नाशिककडे जाण्याची शक्यता असलेली वावटळ (व्हर्टेक्स) सुरतच्या दिशेने पुढे सरकली. त्यामुळे नाशिक परिसरात ढगफुटीसदृश 300 मिलिमीटरपर्यंत तुफान
पावसाचा धोका टळला.
हवामान विभागाच्या अनुमनाचा दाखला देत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी नाशिकमध्ये ढगफुटीसदृश पावसाची शक्यता गृहीत धरून मंत्रालयात आढावा बैठक घेतली होती. आपत्ती निवारणमंत्री व नाशिकचे पालकमंत्रीही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार, नाशिक जिल्हा प्रशासनाने तातडीने स्थानिक पातळीवर उपाययोजना केल्या होत्या. मात्र, पावसाचे संकट सुरतच्या दिशेने रवाना झाल्याने प्रशासकीय यंत्रणेचा जीव भांड्यात पडला. अर्थात नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि घाट परिसरात पावसाचा जोर कायम होता.
हवामान विभागाने महामुंबई परिसरात मुसळधार पावसाला कारणीभूत असणारे व्हर्टेक्स मंगळवारी नाशिक परिसरात सरकेल, असे भाकीत वर्तवले होते. सोमवारी पालघर, वाडा परिसरात या वावटळीचे केंद्र होते. मात्र, ही प्रणाली आता गुजरातच्या दिशेने पुढे सरकली आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, वार्याच्या प्रवाहामुळे सोमवारी पालघरमध्ये तब्बल 450 मिलिमीटर इतका मुसळधार पाऊस पडला होता. हीच वावटळ पुढे त्र्यंबकेश्वर आणि नाशिकच्या पट्ट्यात सरकण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती.
वार्यांचा वेग बदलवू शकतो दिशा
हवामान तज्ज्ञांच्या मते, नाशिकवरील धोका तूर्तास टळलेला
असला तरी व्हर्टेक्स (वावटळ/भोवरा) पूर्णतः कमकुवत होईपर्यंत दिलासा नाही. वेगवान वार्यांनी दिशा बदलल्यास सध्या सुरतमध्ये केंद्रित वावटळ खान्देशकडे सरकण्याची शक्यता नाकारता येत नाही. तूर्तास मुसळधार पावसाचा अंदाज कायम असल्याने नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Whirlwind heads towards Surat; crisis over Nashik averted.