नाशिकरोड : प्रतिनिधी
सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दारणा नदीला मोठा पूर आला असून, मोहगाव येथील दारणा नदीवरील पूल पुराच्या पाण्याखाली आल्याने मोहगाव-कोटमगावचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून, नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
मोहगाव-कोटमगाव या दोन गावांना जोडणार्या दारणा नदीवरील पुलावरून पावसाच्या पुराचे पाणी वाहू लागल्याने पूल पाण्याखाली आला आहे. वाहतूक ठप्प झाली होती.पावसामुळे नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाल्याने पुलावरून पाणी वाहू लागले. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने पुलावरील वाहतूक बंद केली आहे. नागरिकांनी जीव धोक्यात घालून पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पूल पाण्याखाली गेल्याने मोहगावसह परिसरातील गावांचा संपर्क तात्पुरता विस्कळीत झाला आहे. शेतकरी, विद्यार्थी आणि कामानिमित्त प्रवास करणार्या नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Darna River floods; bridge at Mohgaon submerged, connectivity between the two villages cut off.