ब्राह्मणवाडे-शिंदे मार्गावरचा प्रवास झाला जीवघेणा

रखडलेल्या काँक्रिटीकरणामुळे वाहनचालक त्रस्त; ठेकेदाराविरोधात ग्रामस्थांचा संताप

सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर व नाशिक तालुक्यांना जोडणार्‍या ब्राह्मणवाडे-शिंदे-जाखोरी या महत्त्वाच्या मार्गावरील काँक्रिटीकरणाचे काम रखडल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे. रस्ता खोदून ठेवल्यानंतर पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले असून, चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे हा मार्ग अपघातप्रवण बनला असून, वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या काँक्रिटीकरणाच्या कामात संबंधित ठेकेदाराने नियोजनाचा अभाव ठेवत मोठा रस्ता एकाचवेळी खोदून ठेवला. मात्र, त्यानंतर काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.
ब्राह्मणवाडे ते शिंदे या सुमारे दोन किलोमीटरच्या पट्ट्यात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले असून, चिखलामुळे दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागत आहे.
नायगाव खोर्‍यातील दहा ते पंधरा गावांतील शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि नागरिकांसाठी हा प्रमुख संपर्कमार्ग आहे. जिल्हा मुख्यालय, बाजारपेठ आणि विविध शासकीय कार्यालयांमध्ये ये-जा करण्यासाठी याच रस्त्याचा वापर केला जातो.
मात्र, रस्त्याची दुरवस्था आणि कामातील दिरंगाईमुळे रोजच्या प्रवासात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.
रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा करून मुरूम टाकावा, वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था करावी आणि रखडलेले काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी विलास गिते, पोलीसपाटील कमलाकर रामराजे, अविनाश गिते आणि सुरेश काकड यांनी
केली आहे.

The journey on the Brahmanwade-Shinde route turned life-threatening.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *