कामकाज सोमवारपर्यंत तहकूब; विद्यार्थ्यांवर लाठीमारप्रकरणी मोदी-शहांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी
नवी दिल्ली : प्रतिनिधी
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवल्याने राज्यसभेचे कामकाज शुक्रवारी सलग सहाव्या दिवशी विस्कळीत झाले. या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज थेट सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी 20 जुलै विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि पेपरफुटी प्रकरणावरून सरकारला धारेवर धरले. या प्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात येऊन स्पष्टीकरण द्यावे आणि विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणार्या पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी खर्गे यांनी लावून धरली. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले? असा सवाल उपस्थित करत खर्गे यांनी सरकारवर निशाणा साधला. या गदारोळातच केंद्र सरकारने ‘अँटी-पेपर लीक बिल’लोकसभेत मांडले. या विधेयकात पेपरफुटी प्रकरणी 10 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, विरोधी पक्षांनी या विषयावर आधी चर्चा करण्याची आणि अमित शाह यांनी निवेदन देण्याची मागणी कायम ठेवल्याने राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जला अमित शाह जबाबदार आहेत, असा गंभीर आरोप खर्गे यांनी केल्यावर भाजप खासदारांनी जोरदार आक्षेप घेतला, ज्यामुळे सभागृहात गदारोळ वाढला आणि अखेर राज्यसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले.
Aggressive stance of opposition in Rajya Sabha