सातपूर-अंबड लिंकरोडवरील खड्ड्यांवरून शिवसेना आक्रमक

जनआंदोलन करण्याचा इशारा

नाशिक : प्रतिनिधी
सातपूर-अंबड लिंकरोडवरील वाढत्या खड्ड्यांमुळे वाहनचालक व नागरिकांचे हाल होत असून, या प्रश्नावरून शिवसेना (शिंदे) आक्रमक झाली आहे. सातपूर प्रभाग क्रमांक 26 मधील नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाला शनिवारपर्यंत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचा अल्टिमेटम दिला असून, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. याबाबत महापालिका आयुक्तांकडे निवेदन सादर करण्यात
आले आहे.
शिवसेनेचे नगरसेवक भागवत आरोटे, नयना जाधव, निवृत्ती इंगोले आणि हर्षदा गायकर यांनी दिलेल्या निवेदनात सातपूर-अंबड लिंकरोडवरील रगराव पॉइंट ते एक्स्लो पॉइंट या परिसरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचे नमूद केले आहे. या मार्गावर विविध विकासकामे आणि भूमिगत सुविधांची कामे करण्यात आली. मात्र, त्यानंतर रस्त्यांची योग्य प्रकारे दुरुस्ती न झाल्याने अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. सततच्या पावसामुळे हे खड्डे अधिक खोल आणि धोकादायक बनले असून, वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा
लागत आहे.
हा मार्ग सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतींना जोडणारा महत्त्वाचा दुवा असल्याने दररोज हजारो कामगार, कर्मचारी, व्यावसायिक तसेच मालवाहतूक करणारी अवजड वाहने या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचल्यामुळे त्यांची खोली लक्षात येत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची बाब निवेदनात अधोरेखित करण्यात आली आहे.
निवेदनात शनिवारपर्यंत सातपूर-अंबड लिंकरोडवरील सर्व धोकादायक खड्डे तातडीने बुजवून रस्ता वाहतुकीस सुरक्षित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास शिवसेनेच्या वतीने नागरिकांना सोबत घेऊन तीव्र जनआंदोलन करण्यात येईल. आंदोलनामुळे निर्माण होणार्‍या कोणत्याही परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी नाशिक महानगरपालिका प्रशासनाची राहील, असा स्पष्ट इशारा नगरसेवकांनी दिला आहे.

Shiv Sena aggressive over potholes on Satpur-Ambad link road

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *