लोककला चळवळीला प्रोत्साहन मिळावे, कलावंत-अभ्यासकांचे मत
नाशिक : मुकुंद बाविस्कर
पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून, कष्टकर्यांच्या हातावर उभी राहिली आहे, असे संपूर्ण जगाला ठणकावून सांगणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नाशिक शहरात भव्य स्मारक उभारून तेथे त्यांच्या ग्रंथसंपदाचे दालन करावे. शाहीर लोककला चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी या स्मारकात सभागृह असावे. या ठिकाणी विविध उपक्रम राबवावेत, असे मत चळवळीतील कार्यकर्ते व लोककला अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. कारण शहरात अनेक साहित्यिक आणि महापुरुषांचे स्मारक असताना केवळ अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक का उभे राहत नाही, असा सवाल उपस्थित केला
जात आहे.
नाशिक शहरात आज मध्यवर्ती ठिकाणी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याचे मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण होत आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेली लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकाच्या मागणीचा प्रश्न मात्र अद्यापही प्रलंबितच आहे. साहित्य कला राजकारण आणि समाजसुधारणा अशा चौफेर क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी साहित्य क्षेत्रात वेगवेगळ्या विषयांवर सुमारे पाऊणशे पुस्तके लिहिली आहेत. इतकेच नव्हे तर डाव्या विचारसरणीच्या कामगार चळवळीला मोठे योगदान दिले आहे. कंपनी कामगार रस्त्यावर तर श्रमिक बांधकाम मजूर, शेतमजूर या सर्वांसाठी अण्णा भाऊ साठे हे प्रेरणास्थान असल्याने त्यांचे नाशिक शहरात उचित स्मारक व्हावे, तसेच या स्मारकात अभ्यासासाठी भव्य दालन उभारावे, अशी आग्रही मागणी अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचे पाईक असलेल्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
अण्णा भाऊ साठे स्मृती मंडळाचे अध्यक्ष दशरथ मानवतकर यांनी सांगितले की, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची ओळख नव्या पिढीला व्हावी तसेच त्यांचे विचार व कार्य पोहोचण्यासाठी प्रत्येक शहरात, वसाहतीत उद्योग स्मारक उभारावे, अशी मागणी होत आहे. लोककलावंत संघटनेचे जिल्हा प्रवक्ते संजय पंचरस म्हणाले की, पुणे बिबेवाडी येथे अण्णा भाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभे राहिले आहे. त्यासारखे स्मारक नाशिक तसेच मालेगाव यांसह अन्य शहरातदेखील व्हावे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भरत जाधव व मातंग समाज समन्वय समितीचे अध्यक्ष विश्वास कांबळे, अण्णा भाऊ साठे समाज सेवा फाउंडेशनचे दिनकर लांडगे, मातंग संघर्ष समितीचे संस्थापक अशोक साठी आदींचा अनेक संघटनांच्या अधिकार्यांनी अण्णा भाऊ साठे स्मारकाचा प्रश्न मार्गी लावावा, यासाठी शासनाकडे मागणी केली असून, यासंबंधीचे निवेदन पाठविले आहे.
भारतरत्न पुरस्कार द्यावा; विविध संघटनांची मागणी
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतर काळातदेखील समाजातील वंचित घटकांसाठी सतत कार्य केले. सर्वच मागासवर्गीयांचा विकास व्हावा म्हणून त्यांचे योगदान राहिले आहे. याची दखल घेऊन त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र मातंग संघर्ष समिती, मातंग समाज संघटना, बहुजन रयत परिषद, अण्णा भाऊ साठे जागृती संघ, अण्णा भाऊ साठे फाउंडेशन, लहु शक्ती संग्राम परिषद, साठे समाज सेवा फाउंंडेशनसह 14 संघटनांनी केली आहे. तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मरणोत्तर द्यावा, अशीदेखील मागणी या संघटनांनी केली आहे.
अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर
‘कॉम्रेड’ शब्द लावावा
जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीसमोरील चौकात अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याचे काम मागील वर्षभरापासून सुरू होते. सदर काम त्वरित पूर्ण करून अण्णा भाऊंचा पुतळा त्वरित बसवावा, मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. अखेर हे काम पूर्ण झाले असून, दि. 1 ऑगस्ट रोजी या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. मात्र, या पुतळ्याच्या कोनशिलेवर अण्णा भाऊ साठे यांच्या नावासमोर ‘कॉम्रेड’ हा शब्द आवश्यक आहे, अशी मागणी विविध सामाजिक संस्था व संघटना तसेच डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. कारण अण्णा भाऊ साठे यांनी आयुष्यभर डाव्या चळवळीचा पुरस्कार केला आहे.
When will the issue of Lokshahir Sathe’s memorial be resolved?