28 किमीच्या प्रवासाला लागतात 3 तास; भाविक, प्रवासी हैराण
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
पावसाळा सुरू झाल्याने वर्षासहलीसाठी येणारे पर्यटक आणि उत्तर भारतीय श्रावण महिन्यामुळे त्र्यंबकेश्वरला येणार्या भाविकांची संख्या मोठी आहे. मात्र, नाशिक-त्र्यंबक महामार्गाच्या अत्यंत बिकट अवस्थेमुळे प्रवासी व वाहनधारकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. अवघ्या 28 किलोमीटरच्या प्रवासासाठी तब्बल 3 तासांपेक्षा जास्त वेळ लागत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
गुजरात, सिल्वासा, दमन या औद्योगिक भागांना जोडणार्या या मार्गावरून दररोज एसटी महामंडळाच्या 700 फेर्या, सिटीलिंक बस, खासगी ट्रॅव्हल्स आणि अवजड वाहनांची मोठी रहदारी असते. गेल्या काही महिन्यांपासून रस्त्याचे काम सुरू असल्याने एका बाजूची वाहतूक बंद ठेवून दुसर्या बाजूने दुहेरी वाहतूक सुरू आहे. मात्र, चालू असलेल्या रस्त्यावर महाकाय खड्डे पडले आहेत, तर नव्याने तयार केलेला रस्ता उंचावल्याने वाहन चालवताना चालकांची मोठी कसोटी लागत आहे.
दैनंदिन नोकरदार, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांना प्रवासासाठी दिवसातील सहा तास खर्ची घालावे लागत आहेत. या रस्त्यावरून व्हीआयपी, मंत्री, अधिकारी आणि कुंभमेळा आयुक्तांची ये-जा सुरू असते; तरीही या जीवघेण्या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सतत होणार्या अपघातांमुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत, तर काही जण जायबंदी झाले आहेत. कुंभमेळा तोंडावर आला असताना अजून किती काळ हा धोकेदायक प्रवास सहन करायचा? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
Nashik-Trimbak road riddled with potholes