‘देवाभाऊ’ पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या निर्णयक्षमतेचे कौतुक
पुणे : प्रतिनिधी
पुण्यात पार पडलेल्या ‘देवाभाऊ’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात राज्याचे मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. देवेंद्र फडणवीस हे सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व असून, त्यांना खर्या अर्थाने दैवी शक्ती लाभलेली आहे, असे विधान पाटील यांनी या कार्यक्रमात केले. आपली प्रकृती अस्वस्थ असतानाही केवळ मुख्यमंत्र्यांबद्दलच्या आदर आणि प्रेमापोटी आपण या सोहळ्याला उपस्थित राहिल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यांच्या या ‘दैवी शक्ती’च्या विधानामुळे सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या राजकीय प्रवासाचा आणि कार्यपद्धतीचा दाखला देताना पाटील यांनी त्यांच्या गतिमान निर्णयक्षमतेचे विशेष कौतुक केले. वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी महापौरपद आणि त्यानंतर राज्य महापौर परिषदेचे अध्यक्षपद भूषवणार्या फडणवीसांसारखी निर्णयक्षमता इतर मुख्यमंत्र्यांमध्ये क्वचितच पाहायला मिळते, असे ते म्हणाले. विकासकामांच्या प्रस्तावांना आणि निधीला तत्काळ मंजुरी देणे, तसेच शेतकर्यांच्या कर्जमाफीसारखे अत्यंत महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी पहाटेपर्यंत बैठका घेण्याची त्यांची हातोटी इतर नेत्यांपेक्षा वेगळी असल्याचे पाटील यांनी नमूद केले.
मराठा आरक्षण भूमिकेचे कौतुक
मराठा आरक्षणाच्या अत्यंत संवेदनशील मुद्द्यावरही चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचे ठाम समर्थन केले. फडणवीस यांनी केलेल्या सखोल अभ्यास आणि भक्कम कायदेशीर तयारीमुळेच मराठा आरक्षण उच्च न्यायालयात टिकू शकले होते, याची आठवण त्यांनी करून दिली. मात्र, नंतरच्या काळात हे आरक्षण कायम राहू शकले नाही, यावर बोलताना त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीका करणे टाळले. त्याऐवजी, कोविड महामारीच्या काळात निर्माण झालेल्या अनपेक्षित अडचणींमुळे परिस्थिती बदलली, अशी सामंजस्याची भूमिका त्यांनी मांडली.
’दैवी शक्ती’ही वादाच्या भोवर्यात
चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या वेळी ’पोलिसांकडून दगडांवरील फिंगरप्रिंट तपासले जात आहेत’ या त्यांच्या वक्तव्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. या पार्श्वभूमीवर, आता मुख्यमंत्र्यांना थेट ’दैवी शक्ती’ लाभल्याचा दावा केल्यामुळे विरोधी पक्षांकडून यावर कशा प्रकारच्या राजकीय प्रतिक्रिया उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
‘फडणवीस होणार पंतप्रधान!’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनावर लिखित ‘देवाभाऊ’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमास मुख्यमंत्री फडणवीस यांचे काका बाळासाहेब फडणवीस उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी, माझा हा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असे वक्तव्य केले. फडणवीस पंतप्रधान होणार असल्याच्या वक्तव्याचीही राजकीय वर्तुळात आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
Fadnavis possesses ‘divine power’: Chandrakant Patil