आज कोल्हापुरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
कोल्हापूर : प्रतिनिधी
लाखो विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले करून प्रगतीचा राजमार्ग निर्माण करणारे आणि आयुष्यभर समाजसेवेचा ध्यास घेतलेले ’शिक्षण महर्षी’ पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादा) यांचे मंगळवारी, 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजून 8 मिनिटांनी वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण राज्यात आणि शैक्षणिक विश्वात मोठी शोककळा पसरली असून, एका विशाल आधारवडाचे छत्र हरपल्याची अत्यंत भावूक प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. आयुष्यभर माणसांना जोडणार्या आणि निःस्वार्थ भावनेने मूल्ये जपणार्या वडिलांच्या अचानक जाण्याने, नेहमी पहाडासारखे खंबीर वाटणारे त्यांचे सुपुत्र सतेज पाटील हेदेखील तीव्र दुःखाने हळहळले आहेत. डॉ. दादांच्या जाण्याने संपूर्ण पाटील कुटुंबावर आणि त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणार्या हजारो कार्यकर्ते व विद्यार्थ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कोल्हापूरच्या मातीत जन्मलेल्या डॉ. डी. वाय. पाटील यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात आपले अथांग योगदान दिले. तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानगंगा पोहोचवण्याचे महान कार्य त्यांनी उभारले. केवळ सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर प्रशासकीय आणि राजकीय पातळीवरही त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा अमिट ठसा उमटवला. त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगाल या तीन महत्त्वाच्या राज्यांचे राज्यपाल म्हणून त्यांनी अत्यंत सन्मानाने व समर्थपणे राज्याची धुरा सांभाळली. माणूस म्हणून कसे जगावे आणि मूल्यांची जोपासना कशी करावी, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ. डी. वाय. पाटील यांचे जीवन होते, हीच खरी संपत्ती असल्याची भावना त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवावर बुधवारी, 5 ऑगस्ट रोजी कोल्हापूरमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पाटील कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत कसबा बावडा येथील ’यशवंत निवास’ या त्यांच्या निवासस्थानी डॉ. दादांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता ’यशवंत निवास’ येथून त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात
होईल.
Passing of Education Visionary Dr. D. Y. Patil