विशाल वटवृक्ष

असंख्य जीवांचा आधारस्तंभ!

– डॉ. किशोर पवार
भारतातील वडांचे झाड हे केवळ एक विशाल वृक्ष नसून, संपूर्ण परिसंस्थेला आधार देणारे जिवंत पर्यावरणीय केंद्र आहे. बंगळुरूतील प्रसिद्ध ‘डोड्डा आलदा मारा’पासून ते बिहारमधील मुंगेर येथे असलेल्या सुमारे 700 वर्षे जुन्या वडापर्यंत भारतातील अनेक प्राचीन वडांची झाडे शेकडो वनस्पती, पक्षी, सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी, कीटक आणि असंख्य सूक्ष्मजीवांना आश्रय देत आहेत. त्यामुळे शास्त्रज्ञ वटवृक्षांना कळीची प्रजाती (की स्टोन स्पेसिज) असे संबोधतात.
अलीकडेच बिहारमधील मुंगेर येथे असलेल्या एका वडाच्या झाडाचे रेडिओकार्बन डेटिंग तंत्राने वैज्ञानिक वय निश्चित करण्यात आले. या तंत्राने अत्यंत जुन्या खडकांचे, जीवाश्मांचे व नामशेष झालेल्या डायनासोरसारख्या प्राण्यांचे वय निश्चित करता येते.या संशोधनानुसार हे झाड सुमारे 700 वर्षे जुने असल्याचे दिसून आले. जगातील वैज्ञानिकदृष्ट्या अचूक वय निश्चित झालेले सर्वात जुने वडाचे झाड मानले जाते. खरंतर वनस्पतींमध्ये त्यांच्या खोडांमधील वार्षिक वर्तुळांवरून त्यांचे वय ठरविता येते. उष्णकटिबंधीय वृक्षांमध्ये वार्षिक वाढीची स्पष्ट वर्तुळे नसल्यामुळे त्यांच्या वयाचा अंदाज बांधणे कठीण असते. या संशोधनामुळे अशा प्राचीन वृक्षांचे वय अचूकपणे ठरविण्याचा नवा मार्ग उपलब्ध झाला आहे.
वडाच्या झाडाची सर्वांत मोठी वैशिष्ट्यपूर्ण रचना म्हणजे त्याच्या फांद्यांमधून खाली येणारी पारंबी. जमिनीत पोहोचल्यानंतर या पारंब्या नवीन खोडांमध्ये रूपांतरित होतात, त्या झाडाच्या फांद्यांना आधार देतात आणि त्यामुळे झाडाची व्याप्ती आणि पसारा सातत्याने वाढत राहतो. त्यामुळे झाडाचा विस्तार वाढतो.
ग्रेट बनियन ट्री (महावटवृक्ष) हे कोलकाताजवळ, हावडा येथील शिबपूरमधील आचार्य जगदीशचंद्र बोस भारतीय वनस्पती उद्यानात असलेले 250 वर्षांहून अधिक जुने एक प्रचंड झाड आहे. ते अंदाजे 4.67 एकर क्षेत्रात पसरलेले असून, एका झाडाऐवजी संपूर्ण जंगलासारखे दिसते. हे झाड
लहान जंगलाचा भास निर्माण करते. तसेच बंगळुरूपासून अंदाजे 28 किलोमीटर अंतरावर असलेल्या केथोहल्ली गावात, 3 एकर क्षेत्रात पसरलेले ‘द बिग बनियन ट्री’ (स्थानिक भाषेत ‘डोड्डा आलाडा मारा’ म्हणून ओळखले जाणारे ) हे 400 वर्षे जुने एकसंध वटवृक्ष आहे. एक ना दोन अशा अनेक जुन्या प्रचंड वटवृक्षांची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. वैज्ञानिकांच्या मते, वडाचे झाड वर्षभर वेगवेगळ्या काळात फळे देत असल्यामुळे अनेक पक्षी, वटवाघुळे, माकडे, खारी आणि इतर प्राण्यांना सातत्याने अन्न उपलब्ध होते. हे प्राणी वटवृक्षाच्या फळांच्या बिया दूरवर पसरवतात, त्यामुळे जंगलाचे नैसर्गिक पुनरुत्पादन घडते. एका प्रौढ वडाच्या झाडावर शेकडो वनस्पती, शेवाळे, ऑर्किड, कीटक, कोळी, मधमाशा आणि असंख्य सूक्ष्मजीव राहतात. त्यामुळे एकाच झाडावर अनेक अन्नसाखळ्या आणि जैविक संबंध निर्माण होतात. वडाचे झाड हवामान बदलाशी लढण्यातही महत्त्वाची भूमिका बजावते. त्याचा विशाल पर्णसंभार वातावरणातील कार्बन डायऑक्साइड वायू शोषून मोठ्या प्रमाणात कार्बन साठवतो. तसेच ते स्थानिक तापमान कमी करते, मातीची धूप रोखते, भूजल संवर्धनास मदत करते आणि उष्णतेच्या लाटांपासून परिसराचे संरक्षण करते. भारतीय संस्कृतीत वडाला विशेष स्थान आहे. हजारो वर्षांपासून गावातील सभा, सामाजिक निर्णय, धार्मिक विधी आणि प्रवाशांच्या विश्रांतीचे केंद्र म्हणून वडाची निवड केली जात होती. परंतु आज मात्र शहरीकरण, रस्ते रुंदीकरण, बांधकामे आणि जागेच्या कमतरतेमुळे अनेक प्राचीन वडाची झाडे नष्ट होत आहेत. वैज्ञानिकांच्या मते, अशा वृक्षांचे संवर्धन म्हणजे केवळ एक झाड वाचविणे नव्हे, तर त्याच्यावर अवलंबून असलेल्या संपूर्ण परिसंस्थेचे संरक्षण होय. मुंगेरमधील संशोधनामुळे अशा वारसास्थळ वृक्षांची वैज्ञानिक नोंद, संवर्धन आणि संरक्षण अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. वडाचे झाड हे स्वयंपूर्ण पर्यावरणीय विश्व आहे. म्हणूनच बंगळुरूपासून बिहारपर्यंत उभे असलेले हे प्राचीन वड जैवविविधतेचे, पर्यावरणीय स्थैर्याचे आणि सांस्कृतिक परंपरेचे जिवंत प्रतीक
मानले जाते.

Giant banyan tree

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *