संपादकीय

धूलिवंदनाला वीरांच्या मिरवणुकीत भक्ती आणि उत्साहाचा संगम

नाशिक शहराला एक मोठी सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा लाभली आहे. राज्यातील अन्य शहरांप्रमाणे नाशिकनगरीतही अनेक सण-उत्सव आनंदात आणि उत्साहात साजरे होतात. मात्र, त्याहीपेक्षा काही आगळेवेगळे उत्सव नाशिकच्या पुण्यनगरीत साजरे करण्याची परंपरा आहे. त्यातीलच एक म्हणजे वीरांची मिरवणूक होय. दरवर्षी होळीच्या दुसर्‍या दिवशी म्हणजेच धूलिवंदनाला किंवा धुळवडीला घरातील देव्हार्‍यातील पूर्वजांचे टाक खोबर्‍याच्या वाटीत ठेवून त्यांना लाल किंवा पांढर्‍या वस्त्रात बांधून मिरवणुकीने गंगेवर (गोदाघाटावर) नेले जाते. यालाच वीरांची मिरवणूक असे म्हणतात.
सायंकाळी वाजतगाजत रामकुंडावर या मिरवणूक येतात. येथे या टाकांना विधिवत स्नान घालून होळीला प्रदक्षिणा घालण्यात येते. यंदाही वीरांच्या या मिरवणुका भक्तिपूर्ण वातावरणात निघाल्या. यावेळी भगवान शंकर, गणराया, श्रीराम, श्रीकृष्ण, हनुमान आणि छत्रपती शिवाजी महाराज आदींच्या वेशभूषेत सजलेले वीर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. रविवार कारंजा, पंचवटीसह मखमलाबाद, म्हसरूळ, आडगाव, नांदूर, सिडको भागातही पारंपरिक पद्धतीने वीरांच्या मिरवणुका काढून नाशिककरांनी आपली संस्कृती जपली. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात सवाद्य निघालेल्या या मिरवणुकीत आबालवृद्ध सहभागी झाले होते.
शहरात पारंपरिक पद्धतीने होळी सण साजरा
धार्मिक व सांस्कृतिक परंपरेनुसार फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजर्‍या होणार्‍या होळीचा सण शहरात मोठ्या उत्साहात झाला. होळीच्या दिवशी होलिकादहन करून वाईट गोष्टींचा त्याग व चांगल्या विचारांचे स्वागत करत नव्या सुरुवातीचा संदेश देण्यात आला. होळी रे होळी, पुरणाची पोळी असा जल्लोष करत नागरिकांनी सण साजरा केला. संध्याकाळी ठिकठिकाणी होळ्या पेटविण्यात आल्या होत्या. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. श्रीफळाची आहुती देण्यात आली. होळीत भाजलेल्या खोबर्‍याचा प्रसाद भाविकांना वाटण्यात आला. शहरातील विविध संस्था, संघटना, सोसायट्यांतील नागरिकांनी एकत्र येत सार्वजनिक होळी साजरी केली. यामुळे परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते .
पारंपरिक पद्धतीने धुळवडीला जल्लोष
शहरात पारंपरिक पद्धतीने धुळवडीला जल्लोष करण्यात आला. शासकीय सुट्टीमुळे बच्चेकंपनीपासून तरुणांपर्यंत सर्वांनी रंगांची उधळण करत धुळवडीचा आनंद द्विगुणित केला. शहरातील विविध भागांत लहान मुलांनी पिचकार्‍यांतून रंगांची बरसात केली. शाळा व महाविद्यालयांत नैसर्गिक रंगांच्या वापराबाबत करण्यात आलेल्या जनजागृतीचा सकारात्मक परिणाम दिसला. रासायनिक रंगांऐवजी फुलांपासून व औषधी घटकांपासून तयार केलेले नैसर्गिक रंग वापरण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढलेला दिसला. सातपूर भागात मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय मोठ्या संख्येने राहतात. त्यामुळे ते दरवर्षी धुळवड खेळतात.
गोदाई सेवक संस्थेतर्फे गोदा स्वच्छता
गोदाई सेवक बहुउद्देशीय संस्था प्रयोजित गोदा स्वच्छतेचा दोनशेवा सप्ताह अतिशय उत्साहात झाला. येत्या वर्षभरात नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 51 रोपे लावून ते जगविण्याचा संस्थेचा मानस व्यक्त केला. येणारा कुंभमेळा लक्षात घेता प्रशासनाला सहकार्य करण्याच्या भूमिकेतून मदत करण्याची इच्छा बोलून दाखवली. गेल्या चार वषार्ंपासून सातत्याने दर रविवारी सकाळी संस्थेतर्फे गोदा स्वच्छतेचे अभियान आयोजित केले जाते. संस्थेचे ज्येष्ठ गोदासेवक सचिन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आलेल्या पाहुण्यांचे संस्थेच्या विविध पदाधिकार्‍यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षवेधक होती.
दोन दिवसीय कीर्तन महोत्सव
नाशिकमध्ये आयोजित दोन दिवसीय कीर्तन महोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. संत तुकाराम महाराजांच्या संकोचोनि काय झालासी लहान… घेई अपोषण ब्रह्मांडाचें या अभंगाने कीर्तनचंद्रिका रोहिणी परांजपे-माने यांनी महोत्सवाचे उद्घाटन केले. या अभंगाच्या माध्यमातून मानवातील न्यूनगंड दूर करून आत्मविश्वासाने संसार आणि परमार्थाचा स्वीकार करण्याचा संदेश त्यांनी दिला. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था व समाज सहायक संस्थेतर्फे विद्यावाचस्पती, राष्ट्रीय कीर्तन सम्राट सिन्नरकर महाराज तथा श्रीकृष्णानंद महाराज यांच्या जयंतीनिमित्त कुर्तकोटी सभागृह, शंकराचार्य न्यास संकुल, गंगापूर रोड येथे या महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवात कीर्तन शिरोमणी पुरस्कारही प्रदान करण्यात आला.
मविप्रला मराठी भाषा सेवेकरी पुरस्कार
नाशिकनगरीत झालेले चौथे विश्व मराठी संमेलन केवळ एक साहित्यिक पर्व ठरले नाही, तर मराठी भाषा चळवळीच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण ठरले. या समारंभात मराठी भाषा संवर्धन व प्रसारासाठी उल्लेखनीय आणि सातत्यपूर्ण कार्य करणार्‍या मविप्र संस्थेला प्रतिष्ठेचा पहिला मराठी भाषा सेवेकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. नाशिकमधील कुसुमाग्रजनगरीत पार पडलेल्या या विश्व मराठई संमेलनात देश-विदेशातून साहित्यिक, अभ्यासक, कलाकार आणि मराठीप्रेमींची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. मविप्रच्या प्रांगणात भरलेल्या या संमेलनासाठी संस्थेने अहोरात्र परिश्रम घेतले. नियोजन, व्यवस्थापन, साहित्यिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विद्वत्संवाद यांच्या माध्यमातून संमेलनाला अभूतपूर्व यश प्राप्त झाले.
साई धनवर्षा फाउंडेशनतर्फे सन्मान सोहळा
साई धनवर्षा फाउंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यावेळी राज्याच्या विविध भागांतून, तसेच परराज्यातून मान्यवरांची उपस्थिती लाभलेल्या या सोहळ्यामुळे कार्यक्रमाला राज्यस्तरीय स्वरूप प्राप्त झाले. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय देशमुख यांच्या संकल्पनेतून विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. ग्लोबल ह्यूमन वेल्फेअर ऑर्गनायझेशनच्या संस्थापिका अध्यक्षा प्रीती सावंत, नगरसेविका प्रियंका दोंदे, ग्राहक रक्षक समितीच्या राष्ट्रीय संस्थापक अध्यक्षा डॉ. आशा पाटील, ब्रह्माकुमारी संस्थेच्या संचालिका राजयोगिनी, ब्रह्माकुमारी सरलादीदी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
चैत मास बोले रे कोयलिया…
कुसुमाग्रज प्रतिष्ठान आयोजित कुसुमाग्रज स्मरणमध्ये आयोजित पूरब रसगान या उपशास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ठुमरी, दादरा चैती, कजरी, राजस्थानी मांड एकाहून एक अशा पूरब अंगाच्या सुंदर पारंपरिक रचना सादर करण्यात आल्या. राधा नंदकुवर समझाए, अकेली डर लागे, रात सैया बिन, का करू सजनी, चैत मास बोले रे कोयलिया, रंगी सारी गुलाबी, बादरीया रे… हर्षद आणि दुहिता गोळेसर, सागर कुलकर्णी, केतन इनामदार, सुखदा दीक्षित या युवा गायकांना अथर्व वारे तबला, अभिजित भाटजिरे संवादिनी यांची साथ होती. सांगीतिक मार्गदर्शन आणि निवेदन पं. मकरंद हिंगणे यांचे, तर निर्मिती अभिजात अकादमीची होती. कार्यक्रमाला रसिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
इस्कॉनमध्ये गौर पौर्णिमेचा उत्सव
कलियुगातील जीवांच्या उद्धारासाठी भगवान श्रीकृष्ण सुमारे 500 वर्षांपूर्वी बंगालमधील नवद्वीप येथे चैतन्य महाप्रभू यांच्या रूपात अवतरले. त्या दिवशीचा उत्सव गौर पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. जगभरातील इस्कॉन मंदिरांप्रमाणेच नाशिकमधील द्वारका परिसरातील श्री श्री राधा मदन गोपाल मंदिर येथे हा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली होती. श्री श्री राधा मदन गोपाल यांच्या विग्रहांना सुंदर अलंकार व फुलांनी सजविण्यात आले होते. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. हरे कृष्ण महामंत्र जप, दर्शन आरती आणि श्रीमद्भागवतावर प्रवचन आयोजित करण्यात आले. विशेष प्रवचनासाठी इस्कॉनचे वरिष्ठ आंतरराष्ट्रीय प्रचारक चैतन्य चरण प्रभू
उपस्थित होते.

A confluence of devotion and enthusiasm in the procession of heroes for Dhuli Vandana

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

6 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

7 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

7 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

7 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

7 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

7 hours ago