सटाणा प्रतिनिधी
बागलाण तालुक्यातील विरगाव येथे रात्रीच्या सुमारास बिबट्याने शेळींच्या कळपावर हल्ला करुन ८ शेळ्या फस्त केल्यात गावात बिबट्या शिरल्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. विरगांव येथील धोंडू शंकर सोनवणे यांच्या शेळींच्या वाड्यावर बिबट्याने रात्रीच्या सुमारास हल्ला चढवून ८ शेळ्यांना ठार केले. तर एका शेळीला गंभीर जखमी केल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे सावट पसरले आहे. यामुळे सोनवणे यांना आर्थिक नुकसान झाल्याने शासकीय अधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा करून मदत मिळवून द्यावी तर वन विभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरे लावावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे. करंजाडी खोऱ्यात उसाचे क्षेत्र अधिक होते. बिबट्यांचे वास्तव्य उसाच्या शेतीमध्येच राहात होते. उस तोडणी सुरू झाल्यामुळे त्याचे वास्तव्य धोक्यात आल्याने ते मानवी वस्तींकडे चाल करू लागले आहेत. गावात बिबट्या शिरल्यामुळे विरगांव व परिसरातील गावे दडपणाखाली आली आहेत.