इबोला व्हायरसबाबत केंद्र सरकार सतर्क!

देशातील सर्व विमानतळे, बंदरांवर ‘स्क्रीनिंग’ सुरू

नवी दिल्ली :
जगातील वाढत्या आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार पूर्णपणे अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आफ्रिकेतील वाढता प्रादुर्भाव पाहून ‘ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी’ (जागतिक आरोग्य आणीबाणी) घोषित केल्यानंतर, भारत सरकारने तातडीने देशव्यापी ‘हेल्थ अ‍ॅडव्हायझरी’ जारी केली आहे. देशात व्हायरसचा शिरकाव रोखण्यासाठी सर्व विमानतळे, बंदरे आणि आंतरराष्ट्रीय एंट्री पॉइंट्सवर परदेशातून येणार्‍या प्रवाशांची कडक स्क्रीनिंग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतात अद्याप इबोलाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, ही दिलासादायक बाब असली, तरी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाला नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत.
इबोला व्हायरसचा प्रादुर्भाव सध्या मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतील देशांमध्ये वेगाने होत आहे. काँगो, युगांडा, सुदान, गिनी, लायबेरिया आणि सिएरा लिओन या देशांमध्ये या आजाराने आतापर्यंत 130 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, सुमारे 500 हून अधिक जण बाधित आहेत. केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बाधित देशांतून येणार्‍या प्रवाशांमध्ये संसर्गाची कोणतीही लक्षणे आढळल्यास, त्यांनी इमिग्रेशन तपासणीपूर्वीच विमानतळावरील हेल्प डेस्क किंवा आरोग्य अधिकार्‍यांना त्वरित माहिती देणे बंधनकारक आहे. याशिवाय, कोणताही प्रवासी नकळत जरी एखाद्या इबोला बाधिताच्या संपर्कात आला असेल, तर त्यांनी स्वतःहून आरोग्य विभागाला कळवण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. इबोलाबाबत गांभीर्य न बाळगल्यास कोरोना महामारीसारखी धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा आरोग्य मंत्रालयाने
दिला आहे.

Central government on alert regarding Ebola virus!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *