683 गावे अद्याप टँकरवर अवलंबून
♦ जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा कायम
♦ पाणीटंचाईचे संकट गंभीर
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने मोठ्या व मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा चिंताजनकरीत्या कमी झाला आहे. 25 जून 2026 रोजीच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील 26 धरणांमध्ये एकूण 14,401 दशलक्ष घनफूट पाणीसाठा असून, तो केवळ 20.39 टक्के इतकाच आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरणांमध्ये 38.03 टक्के पाणीसाठा होता.
जिल्ह्यातील प्रमुख धरणांपैकी गंगापूरमध्ये 31.83 टक्के, मुकणेमध्ये 19.09 टक्के, दारणामध्ये 7.16 टक्के, कडवामध्ये 16.59 टक्के, गिरणामध्ये 24.70 टक्के तर चणकापूरमध्ये 30.90 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. नांदूरमध्यमेश्वर बंधार्यात मात्र 99.22 टक्के पाणीसाठा आहे.
दरम्यान, पाणीटंचाईची तीव्रता अद्याप कायम असून, जिल्ह्यातील 683 गावे व वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या भागांतील सुमारे 3 लाख 37 हजार 894 नागरिकांची तहान टँकरवर भागवली जात आहे.
सध्या जिल्ह्यात 192 खासगी टँकर कार्यरत असून, दररोज 409 खेपा मारून पाणीपुरवठा केला जात आहे. सर्वाधिक टंचाई येवला तालुक्यात असून, तेथे 114 गावे व वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्याखालोखाल नांदगाव (230), सिन्नर (87), मालेगाव (65) आणि इगतपुरी (52) तालुक्यांचा क्रमांक लागतो.
हवामान विभागाने पुढील काही दिवसांत मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज वर्तविला असला तरी जिल्ह्यातील धरणसाठा वाढण्यासाठी चांगल्या पावसाची नितांत गरज आहे. पाऊस लांबल्यास पाणीटंचाईचे संकट आणखी गडद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील पाणीस्थिती
एकूण धरणे – 26
एकूण साठवण क्षमता – 70,619 द.ल.घ.फू.
सध्याचा पाणीसाठा – 14,401 द.ल.घ.फू.
पाणीसाठा टक्केवारी – 20.39%
गेल्या वर्षीचा साठा – 38.03%
टँकरग्रस्त गावे-वाड्या – 683
लाभार्थी लोकसंख्या – 3,37,894
कार्यरत खासगी टँकर -192
दररोजच्या खेपा – 409
सर्वाधिक टँकरग्रस्त तालुका येवला – (114 गावे-वाड्या)
Dam storage in the district is only 20.39 percent.