संपादकीय

केवळ प्रसिद्धीसाठी समाजकार्य नको!

ध्या प्रत्येक समाजात समाजकार्य करण्याची स्पर्धा लागली आहे. प्रत्येक जण स्वतःला सामाजिक कार्यकर्ता समजत आहे. स्वतःला सामाजिक कार्यकर्ता समजणारी माणसे सध्या समाजात खूप वाढली आहेत. हे सामाजिक कार्यकर्ते समाजकार्य करतात टिचभर आणि लोकांना आव आणून सांगतात ढीगभर. म्हणजे समाजकार्य करण्यात माझा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. समाजकार्य करण्यात मी आघाडीवर आहे. सामाजिक कार्यात माझा हात कोणीही धरू शकत नाही. असे इतरांना मीठ-मिरची लावून सांगण्यात ही माणसे फार पटाईत असतात. आपल्या कमी कार्याचा जास्त गवगवा करतात. म्हणजे स्वतःच स्वतःच्या कार्याची प्रशंसा करून घेतात. मान्य आहे की, आपण समाजकार्य खूप केले आहे.
सामाजिक क्षेत्रात तुमचे योगदान खूप मोठे व उल्लेखनीय आहे. तुम्ही समाजाचे जनसेवक आहात.गोरगरिबांच्या, सर्वसामान्य माणसांच्या आणि तळागाळातील लोकांच्या समस्या सोडवण्यात आपण अग्रेसर आहात. म्हणून सामाजिक क्षेत्रात तुमचा हात कोणीच धरू शकत नाही. हे जरी खरे असले, तरी आपण एक चूक करतोय, ती चूक म्हणजे आपण केलेले सामाजिक कार्य स्वतःहून लोकांना सांगत बसणे तर आपण केलेले समाजकार्य लोकांना सांगत बसण्याची काहीच गरज नाही. लोकांना आपोआप कळते की, आपण काय समाजकार्य करत आहोत? आणि काय करत नाही? ज्याप्रमाणे फुलांना सांगावे लागत नाही की, मी सुगंधी आहे म्हणून त्यांचा कीर्ती सुगंध आपोआप सर्वदूर पसरतो आणि लोकांना सुगंध देतो. त्याप्रमाणेच आपण केलेले समाजकार्य आपोआप लोकांना कळते आणि समाज आपोआपच तुमचे कौतुक करायला पुढे येतो. बांधवांनो, आपण समाजकार्य जरूर करावे, पण आपण केलेले समाजकार्य लोकांना सांगत बसू नये. अशाने आपली सामाजिक प्रतिष्ठा कमी होते. आपल्या माघारी लोक आपली टिंगलटवाळी करतात. आपण आपल्याच हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतल्यासारखे होते.
यावरून असा निष्कर्ष निघतो की, आपण जे समाजकार्य करतोय ते केवळ आपल्या स्वार्थासाठीच म्हणजे भविष्यात एखादी निवडणूक लढवण्यासाठी किंवा एखादा सर्वोच्च पुरस्कार मिळवण्यासाठी. कारण आजकाल जिकडे बघावे तिकडे प्रत्येक जण स्वार्थासाठी समाजकार्य करत असल्याचे दिसते. कोणतातरी स्वार्थ साधण्यासाठी प्रत्येकाची धडपड समाजकार्य करताना दिसते. अशा सामाजिक कार्यकर्त्यांना पेपरबाजी व बॅनरबाजी करण्याची फार विचित्र सवय असते.
कोणतेही सामाजिक कार्य केले की, हे लोक लगेच पेपरबाजी व बॅनरबाजी करतात. काढलेला फोटो सोशल मीडियावर टाकून नुसता कहर करतात.आपल्या कमी कार्याचा सोशल मीडियावर नुसता गवगवा करतात. म्हणजे यांना प्रसिद्धीची खूप मोठी हाव असते. यांना स्वतःचे नाव मोठे व्हावे वाटते. पण अशा लोकांना कोण सांगेल? की, नाव मोठे होण्यासाठी कामदेखील तसेच मोठे करावे लागते. तेव्हा लोक आपल्याला आपोआपच मोठे म्हणतात.आपल्या कार्याची वाहवा करतात. स्वतःला पर्यावरणप्रेमी समजणारे काही महाभाग पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरणाचे महत्त्व सांगत फिरतात. पर्यावरण अबाधित राहावे म्हणून मी खूप वृक्षलागवड केली आहे आणि तुम्हीदेखील करा म्हणून लोकांना आवर्जून सांगतात. वर्तमानपत्रांत किंवा सोशल मीडियावर काढलेला फोटो व्हायरल करतात. आणि नंतर त्या झाडांकडे बघतदेखील नाहीत. ती झाडे जिवंत आहेत का? का मेलीत? याचे त्यांना काहीही देणे-घेणे नसते. म्हणजे हे लोक केवळ प्रसिद्धीसाठी समाजकार्य करतात, हे यावरून स्पष्ट होते. जे खरोखर पर्यावरणप्रेमी असतात, ज्यांना पर्यावरणाची खूप खूप आवड असते, ती माणसे झाडे लावतातही आणि ती झाडे मोठी होईपर्यंत त्या झाडांचे काळजीने संगोपनदेखील करतात. त्यांना प्रसिद्धीची हाव नसते ना पेपरबाजीची अशा गोष्टीपासून ते चार हात लांबच राहतात. त्यांचे निसर्गावर खूप प्रेम असते म्हणून ते या पृथ्वीला सृष्टिसौंदर्याने नटवण्याचा प्रयत्न करतात.
अशा पर्यावरणप्रेमींना मनापासून सलाम करावा वाटतो आणि केवळ प्रसिद्धीसाठी समाजकार्य करणार्‍या लोकांना चांगलाच धडा शिकवावा वाटतो. कारण आजकाल समाजकार्य करणे आणि निवडणूक लढवण्यासाठी प्रसिद्धी करणे, हे आजकालच्या लोकांचे धोरण बनले आहे. प्रत्येक क्षेत्रात प्रसिद्धीला हापापलेली माणसे पाहायला आवर्जून मिळतात. ही माणसे आपला स्वार्थ साधण्यासाठी आपल्या कार्याची नुसती प्रसिद्धी करत असतात. या पृथ्वीतलावर अनेक महान व्यक्ती होऊन गेले. त्यात समाजसुधारक व क्रांतिकारक होऊन गेले. जसे की, तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान समाजसुधारक आपल्या भारतभूमीत होऊन गेले. यांनी आपले उभे आयुष्य समाजसेवेसाठी अर्पण केले. गोरगरीब, सर्वसामान्य व तळागाळातील लोकांच्या जीवनाला कलाटणी दिली. या महापुरुषांनी समाज सुधारण्याचे जे काम केले आहे, त्या कार्याला जगात तोड नाही. त्यांच्यामुळेच तर आज आपण सुखाने व सन्मानाने जीवन जगत आहोत. खूप शिक्षण शिकून मोठमोठ्या पदांवर विराजमान होत आहोत. एवढे अफाट कार्य या महामानवांनी आपल्यासाठी केले आहे, पण त्यांनी या कार्याची प्रसिद्धी स्वतःहून कधी केल्याचे इतिहासात तर कधी वाचनात आले नाही. या महापुरुषांना जाऊन आज कित्येक वषर्ं झाली आहेत तरीसुद्धा हे महापुरुष मेल्यानंतरही कित्येक लोकांच्या हृदयात व मनात कायम जिवंत आहेत. मेल्यानंतरही त्यांची कीर्ती जगभर गाजत आहे. त्यांनी स्वतः स्वतःची प्रसिद्धी न करता, आज जगभर लोकांनी त्यांची प्रसिद्धी केली आहे. आपण तर त्यांच्यापुढे काहीच नाही. आपले सामाजिक कार्य त्यांच्यापुढे शून्य आहे, तरीसुद्धा आपण प्रसिद्धीला एवढे का हापापले आहोत? कळायला मार्ग नाही. म्हणून बांधवांनो, आपण या महापुरुषांचा आदर्श घेऊन खूप सामाजिक कार्य करावे, गोरगरीब, सर्वसामान्य व तळागाळातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रामाणिकपणे समाजकार्य करावे. एक दिवस आपोआपच आपलीसुद्धा प्रसिद्धी होईल. पण केवळ प्रसिद्धीसाठी समाजकार्य नको, हे नेहमी ध्यानात ठेवा.

    बुद्धभूषण कांबळे   7498715661

Gavkari Admin

Recent Posts

पत्नीने केले भयानक कांड, आधी पतीला मारले, नंतर कुऱ्हाडीने केले तुकडे, अन टाकले शोष खड्ड्यात

निर्दयी पत्नीचे बिंग दोन महिन्यांनंतर फुटले सुरगाणा : प्रतिनिधी पतीची कुर्‍हाडीच्या सहाय्याने हत्या केल्यानंतर मृतदेहाचे…

9 hours ago

अवकळलेल्या मराठी रंगभूमीचा लोकाश्रय!

ल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, चित्रपट निर्माते,…

16 hours ago

ड्रीमलायनरचा अप‘घात’

अहमदाबादमध्ये गुरुवारी (दि. 12) एअर इंडियाचे बोईंग 787 ड्रीमलायनर हे बहुचर्चित विमान आकाशात झेपावले आणि…

16 hours ago

हितचिंतक

वास्तविक आणि खरे हितचिंतक हे नेहमीच कठोर भूमिकेत असतात. तसं पाहिलं तर बंधन हे सध्या…

16 hours ago

छत्र्यांचाही फॅशनेबल तडका

पावसाळा म्हणजे फक्त पावसाचा आनंद नाही, तर फॅशनचाही एक स्पेशल हंगाम! या हंगामाची खरी स्टाइल…

16 hours ago

नाशिकमध्ये 26, 27, 28 डिसेंबरला विश्व मराठी संमेलन

नाशिक : प्रतिनिधी नाशिक शहरात चौथे विश्व मराठी संमेलन 26, 27 व 28 डिसेंबरला मविप्र…

17 hours ago